जादा व्याजाचे आमिष दाखवून ठेवीदारांना गंडविले
By Admin | Updated: April 17, 2017 23:19 IST2017-04-17T23:19:25+5:302017-04-17T23:19:25+5:30
मध्य प्रदेशातील कंपनीचा प्रताप : शहादा व धडगाव तालुक्यातील ठेवीदारांची तक्रार

जादा व्याजाचे आमिष दाखवून ठेवीदारांना गंडविले
शहादा : ठेवीवरील रक्कमेवर जादा व्याज देण्याचे आमिष दाखवून मध्य प्रदेशातील एका कंपनीने शहादा व धडगाव तालुक्यातील गोरगरीब जनतेस सुमारे तीन कोटी रुपयांचा चुना लावल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कंपनीचे एजंट म्हणून काम करणा:या धडगाव तालुक्यातील 10 एजंटांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुखांकडे धाव घेतली आहे.
मध्य प्रदेशातील जी लाईफ ग्रुप ऑफ कंपनीने शहादा व धडगाव तालुक्यात एजंट नेमून ठेवी गोळा केल्या आहेत. ठेवीवर अधिक व्याजाचे प्रलोभन दाखवून व खोटी आश्वासने देऊन सुमारे पाच ते सहा वर्षापासून ठेवी गोळा करण्याचे काम सुरू होते. दरमहा 300 रुपयांपासून ते दोन हजार, पाच हजार रुपयांची गुंतवणूक करून 60 महिन्यात दीडपट पैसे देण्याचे आमिष कंपनीकडून दाखविण्यात आले होते. या आमिषाला बळी पडून अनेकांनी या योजनेत पैसे गुंतवले होते. ज्यांची मुदत पूर्ण झाली त्यांना कंपनीने धनादेशही दिले होते. मात्र कंपनीने दिलेले सहा ते सात लाखांचे परतफेडीचे धनादेशही परत आल्याने गुंतवणूकदारांना आपण फसविले गेल्याचे लक्षात आले. कंपनीच्या शिरपूर येथील कार्यालयात ठेवीदार आणि एजंट यांनी पैसे परत मिळण्याची मागणी केली असता तेथेही त्यांच्या पदरी निराशा पडली.
धडगाव तालुक्यातील ठेवीदारांनी एजंटांकडे पैशांचा तगादा लावल्याने आणि कंपनीकडून पैसे मिळण्याची अपेक्षा मावळल्याने सरदार नवेल (धडगाव), दिगंबर पवार (अंबापूर, ता.शहादा), सुरेश पावरा (इस्लामपूर, ता.शहादा), गोविंद चितोड (इस्लामपूर, ता.शहादा), गोपाळ शिंदे (धडगाव), संजय शिंदे (वेरी, ता.अक्कलकुवा), उदयसिंग पवार, (अंबापूर, ता.शहादा), राजेंद्र पावरा (धडगाव), अशोक निकुंब (गणोर, ता.शहादा) व गणेश परमार (धडगाव) या 10 एजंटांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीसप्रमुखांकडे धाव घेऊन जी लाईफ ग्रुप ऑफ कंपनीज, संस्थापक चेअरमन गिरीराज पांडे, व्यवस्थापकीय संचालक दीपक शर्मा, यक्षप्रसाद शर्मा, अनामत अली, रवीराज व व्यवस्थापक जी लाईफ कंपनी शिरपूर कार्यालय यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
जी लाईफ कंपनीच्या संचालकांनी अधिक व्याजाचे प्रलोभन दाखवून व खोटे आश्वासन देऊन गोरगरीब लोकांची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. कंपनीच्या संस्थापकांतर्फे नंदुरबार येथे दीपक शर्मा व गिरीराज पांडे यांनी सेमीनार घेऊन विविध प्रलोभने दाखवून ठेवी गोळा केल्या. कंपनीने ठेवीधारकांना प्रमाणपत्रही दिले आहेत. परंतु मुदत पूर्ण होऊनही कंपनीकडून पैसे परत न मिळाल्याने त्यांची फसवणूक झाली आहे. ठेवीदार पैशांसाठी एजंटांकडे तगादा लावत असल्याने एजंटांचे जगणे मुश्कील झाले आहे. गोरगरीब आदिवासी जनतेची फसवणूक करणा:या जी लाईफ कंपनी व त्यांच्या संचालकांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी आहे.
(तालुका प्रतिनिधी)