वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी ग्राहकांना लेखी सूचना देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:29 IST2021-03-26T04:29:46+5:302021-03-26T04:29:46+5:30

शहादा विभागातील वीजबिल वाटप हे संबंधित व्यवस्थेकडून हेतूपुरस्सर विलंबाने केले जात आहे. त्याबाबत माहिती घेतली असता शहादा शहरात एका ...

Demand for written notice to customers before power outage | वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी ग्राहकांना लेखी सूचना देण्याची मागणी

वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी ग्राहकांना लेखी सूचना देण्याची मागणी

शहादा विभागातील वीजबिल वाटप हे संबंधित व्यवस्थेकडून हेतूपुरस्सर विलंबाने केले जात आहे. त्याबाबत माहिती घेतली असता शहादा शहरात एका व्यक्तीकडे बिलांचे वाटप करण्याचे काम दिले गेले आहे. तीच परिस्थिती ग्रामीण भागाचीही आहे. जरी महावितरणतर्फे ग्राहकांना एसएमएस व ई-मेलद्वारे थकबाकी भरण्यासंदर्भात वेळोवेळी निर्देश दिले जात असले. तरी सर्वच ग्राहकांकडे ई-मेल आयडी व मोबाईल आहे असे नाही आणि नेटवर्क अभावी अनेक वेळा ग्राहकांना वीज खंडित करण्याबाबतची सूचना मिळत नाही. यामुळे थकबाकीदार ग्राहकांकडून बिले वेळेवर भरली जात नसल्याने थकबाकीदारांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याचे दिसत आहे. अशातच महावितरणकडून होत असलेल्या धडक कारवाईने ग्राहक आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये वादविवाद निर्माण होत असल्याचे दिसून येते.

लॉकडाऊननंतर आता जनजीवन काहीसे पूर्वपदावर येत असल्याचे दिलासादायक चित्र असतानाच तालुक्यात कोरोना विषाणूने पुन्हा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या उद्रेकामुळे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी रात्रीची संचारबंदी तसेच प्रत्येक शनिवारी व रविवारी संपूर्ण जनता कर्फ्यूचा आदेश दिला आहे. त्यामुळे पुन्हा रोजगाराचे संकट उभे ठाकले आहे. अशात सर्व ग्राहकांना वीजबिले भरताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे वीजजोडणी खंडित करण्यापूर्वी ग्राहकांना किमान आठ दिवस आधी लिखित स्वरूपात सूचना देण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे आम्ही करीत आहोत.

तसेच महावितरणतर्फे स्वतंत्र यंत्रणेमार्फत ग्राहकांचे वीज मीटर रीडिंग घेतले जात आहे. सदरची यंत्रणा कधीही दिलेल्या तारखेला रिडिंग घेत नसल्याच्या असंख्य तक्रारी आहेत. शहरात वीज मीटर हे घराच्या बाहेरील भिंतीवर महावितरणनेच लावले असताना वीजबिलात मीटर रीडिंग उपलब्ध नाही असे होऊच शकत नाही. यंत्रणेच्या चुकीमुळे महावितरणकडून अंदाजित युनिटचे बिल ग्राहकांच्या माथी मारण्यात येत आहे. प्रत्यक्षात ही चूक महावितरणने नेमलेल्या यंत्रणेकडून झालेली असल्याने यापुढे यंत्रणेने वेळेवर वीज मीटर रिडिंग घेतले नाही तर त्याची सर्वस्वी जबाबदारी त्यांचेवर निश्चित करून त्या बिलांची वसुली संबंधित यंत्रणेकडून करावी तसेच या सर्व प्रकाराची चौकशी वरिष्ठ पातळीवरून होणे आवश्यक आहे.

निवेदनावर जिल्हाध्यक्षा वंदना तोरवणे, शहादा तालुकाध्यक्ष प्रा. डी. सी. पाटील, कार्याध्यक्ष डॉ. खलिल शाह, सचिव प्रा. विजय येवले, खजिनदार किन्नरी सोनार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Demand for written notice to customers before power outage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.