फिरत्या वैद्यकीय पथकांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:17 IST2021-03-29T04:17:55+5:302021-03-29T04:17:55+5:30
मोकाट श्वानांचा त्रास नंदुरबार : लाॅकडाऊनमुळे दोन दिवस शुकशुकाट असल्याने मोकाट श्वानांची समस्या पुन्हा समोर आली. दिवसा आणि रात्रीही ...

फिरत्या वैद्यकीय पथकांची मागणी
मोकाट श्वानांचा त्रास
नंदुरबार : लाॅकडाऊनमुळे दोन दिवस शुकशुकाट असल्याने मोकाट श्वानांची समस्या पुन्हा समोर आली. दिवसा आणि रात्रीही श्वानांच्या झुंडी गल्लोगल्ली भुंकत फिरत असल्याचे दिसून आले होते. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दाट वस्तीच्या भागात मोकाट श्वानांचा सर्वाधिक त्रास असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांकडून केले जातेय सहकार्य
नंदुरबार : शहरात लाॅकडाऊनमुळे शनिवार आणि रविवार असे दोन दिवस शुकशुकाट होता. दरम्यान, जनता कर्फ्यू असला तरीही वैद्यकीय कारणांसाठी अनेक जण शहरात येत होते. दिवसा आणि रात्री येणाऱ्या बऱ्याच जणांना शहरातील रुग्णालयांची माहिती नसल्याने पोलिसांकडून त्यांना माहिती देत सहकार्य करण्यात येत होते. नंदुरबार शहरातील काही भागांत बॅरिकेड लालेले असल्याने रस्ता न मिळणाऱ्यांना पोलिसांकडून माहिती दिली गेली.
कारवाईची मागणी
नंदुरबार : कोळदे ते नंदुरबारदरम्यान रस्ता दुरुस्तीची मागणी करूनही कारवाई करण्यात येत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, या खड्ड्यांमुळे नागरिक अडचणीत आले आहेत. या मार्गावर अपघातांची संख्याही वाढली असल्याने रस्ता दुरुस्तीची मागणी आहे.
गुटका विक्री वाढली
नंदुरबार : जिल्ह्यात दोनदिवसीय लाॅकडाऊनमुळे अवैध गुटका विक्रीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ठिकठिकाणी चोरट्या पद्धतीने गुटका विक्री सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. वाढीव दराने गुटखा व पानमसाला विक्री होत असल्याचे स्पष्ट होऊनही कारवाई झालेली नाही.
ग्रामीण भागात भाजीपाला व किराण्यात दरवाढ
नंदुरबार : दोनदिवसीय जनता कर्फ्यूनंतर एक एप्रिलपासून १५ दिवसांचा लाॅकडाऊन पाळला जाणार आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, यामुळे ग्रामीण भागात भाजीपाला व किराणा मालाच्या दरात वाढ झाल्याचे बोलले जात आहे. गरजेचा भाजीपाला, तसेच किराणा मालातील खाद्यतेल व मसाले यांच्या दरात १० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.
फेरीवाले संकटात
नंदुरबार : दैनंदिन खाद्यपदार्थ तसेच इतर वस्तू विक्री करून उदरनिर्वाह करणारे फेरीवाले संकटात सापडले आहेत. १५ दिवसांच्या लाॅकडाऊन काळात नियोजन कसे, करावे असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित होत आहे. गेल्या काही दिवसांपासून व्यवसायही कमी झाला असल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.