ग्रामविकास अधिकाऱ्यांना स्वतंत्र कार्यभार देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:34 IST2021-05-25T04:34:09+5:302021-05-25T04:34:09+5:30
ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे इतरही गावांचा पदभार असल्याने विकासकामांना खीळ बसली आहे. अक्कलकुवा ही तालुक्याच्या ठिकाणची मोठी ग्रामपंचायत असून खापर, मोरांबा, ...

ग्रामविकास अधिकाऱ्यांना स्वतंत्र कार्यभार देण्याची मागणी
ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे इतरही गावांचा पदभार असल्याने विकासकामांना खीळ बसली आहे. अक्कलकुवा ही तालुक्याच्या ठिकाणची मोठी ग्रामपंचायत असून खापर, मोरांबा, कोराई, उमरागव्हाण, मोलगी, काठी, भगदरी, पिंपळखुटा, होराफली आणि कुकडीपादर या मोठ्या ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींच्या क्षेत्राच्या विकासासाठी स्वतंत्र पदभार असलेल्या ग्रामविकास अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी सातत्याने होत आहे. प्रशासनाने या मोठ्या ग्रामपंचायतींचा अतिरिक्त कार्यभार ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे सोपवला असल्याने त्या-त्या ग्रामपंचायतींच्या विकासाला खीळ बसली आहे. तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींच्या कार्यभार असलेल्या ग्रामविकास अधिकाऱ्यांना तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी अथवा ग्रामपंचायतीच्या ठिकाणी राहण्याचे निर्देश देण्यात यावे, जेणेकरून या ग्रामपंचायतींच्या विकासकामांमध्ये अधिक लक्ष देता येईल. विशेष म्हणजे सद्य:स्थितीत सदर ग्रामपंचायतींचा कार्यभार असलेले ग्राम विकास अधिकारी जिल्ह्याच्या ठिकाणाहून आपल्या सोयीनुसार ग्रामपंचायतीत ये-जा करत असल्याचे दिसून आले आहे. या ग्रामपंचायतींच्या अनेक विविध योजनेतून होणाऱ्या विकास कामांमध्ये तसेच विविध योजना राबविण्यात अडथळे निर्माण होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. सद्य:स्थितीत कोरोना महामारीचे संकट तालुक्यात उभे ठाकले असून ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. हा प्रादुर्भाव वेळीच रोखण्यासाठी ग्राम विकास अधिकाऱ्यांनी वेळीच उपाययोजना करण्यासाठी तालुका मुख्यालयी अथवा ग्रामपंचायतीच्या ठिकाणी वास्तव्यास राहणे गरजेचे आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गांभीर्याने या विषयाकडे लक्ष देऊन या ग्रामविकास अधिकाऱ्यांना तालुका मुख्यालय अथवा ग्रामपंचायत मुख्यालयी राहण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी आहे. जिल्हा पातळीवरील कार्यरत असलेले सर्व अधिकारी जिल्ह्याच्या मुख्यालयी राहत असताना तालुका पातळीवरील अनेक विभागातील अधिकारी तालुका मुख्यालयी न राहता थेट जिल्हा पातळीवरून दररोज ये-जा करीत असल्यामुळे तालुक्यातील विकासाची गती खुंटली आहे. तालुक्याच्या विकासासाठी तसेच प्रत्येक गावाच्या विकासासाठी तालुका स्तरावरील तसेच ग्रामस्थ घरावरील अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे सक्तीचे निर्देश करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
जिल्हा पातळीवरील जिल्हा प्रशासनाचे प्रमुख जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकसह सर्व जिल्हा पातळीवरील अधिकारी जिल्हा मुख्यालय राहत असताना तालुका पातळीवरील अधिकारी तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी न राहता थेट जिल्हा पातळीवरून दररोज ये-जा करणे ही बाब आश्चर्यकारक असून जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांना तालुका पातळीवरील अधिकारी थेट आव्हान तर देत नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.