निधीअभावी रखडलेली हाताेडा पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:32 IST2021-07-30T04:32:32+5:302021-07-30T04:32:32+5:30
तळोदा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हातोडा पाणीपुरवठा योजनेचे काम जवळपास ७० ते ७५ टक्के झाले आहे. परंतु वेगवेगळ्या भागात नवीन ...

निधीअभावी रखडलेली हाताेडा पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्याची मागणी
तळोदा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हातोडा पाणीपुरवठा योजनेचे काम जवळपास ७० ते ७५ टक्के झाले आहे. परंतु वेगवेगळ्या भागात नवीन पाईपलाईन, जलकुंभ व तापी नदी येथे राहिलेल्या किरकोळ कामासाठी ही योजना गेल्या दोन अडीच वर्षांपासून रखडली आहे. यासाठी लागणारा निधी उपलब्ध होत नसल्यामुळे योजनेचे कामही मार्गी लागत नसल्यामुळे तळोदा शहरातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निधीसाठी बुधवारी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली होती. त्याचबरोबर तळोदा शहरात काही ठिकाणी पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे नवीन कूपनलिकांची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे. त्यावेळी मंत्री पाटील यांनी तळोदा शहराच्या पाणी योजनेसाठी जेवढा निधी लागेल तेवढा उपलब्ध करून देण्याची हमी पदाधिकाऱ्यांना दिली. एवढेच नव्हे तर पुढील महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात प्रत्यक्ष नंदुरबार किंवा तळोदा येथे येणार असून, तळोदा शहराच्या हातोडा पाणीपुरवठा योजनेची सद्यस्थितीची माहिती घेऊन ही योजना कायमस्वरूपी मार्गी लावण्याचे त्यांनी सांगितले. या वेळी मंत्र्यांना तापी पाणीपुरवठा योजनेचे निवेदन ही देण्यात आले. याप्रसंगी सेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. विक्रांत मोरे, तळोदा शहर प्रमुख जितेंद्र दुबे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय पटेल, ज्येष्ठ कार्यकर्ते आनंद सोनार, नितीन ठाकरे उपस्थित होते. दरम्यान या पदाधिकाऱ्यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेऊन तळोदा शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
नगरपालिकेचा १३ कोटी रूपयांचा प्रस्ताव पडून
तळोदा शहरातील तापी पाणीपुरवठ्याच्या विस्तारित योजनेसाठी येथील नगरपालिकेने गेल्या दोन अडीच वर्षांपूर्वी साधारण १३ कोटीचा प्रस्ताव संबंधित विभागाकडे दाखल केला आहे. परंतु कार्यवाही अभावी हा प्रस्ताव तसाच पडून आहे. त्यासाठी नगरपालिका पदाधिकाऱ्यांनी यंत्रणेकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. मात्र, अजूनही दाद मिळत नसल्याची शहरवासीयांची व्यथा आहे. निधी अभावी या योजनेचे ही घोंगडे भिजत पडले आहे. वास्तविक योजनेचे काम ७० ते ७५ टक्के झाले आहे. हत्ती निघून केवळ शेपूटच उरल्याची स्थिती योजनेची आहे. निधीसाठी लोकप्रतिनिधींनी देखील पूर्ण दुर्लक्ष केल्याने तळोदा शहरातील नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. आधीच शहरातील लोकांना कूपनलिकांचे क्षारयुक्त पाणी प्यावे लागत आहे. आता जलशुद्धीकरण प्रकल्प उपलब्ध असताना केवळ किरकोळ कामामुळे तो ही तसाच धूळखात पडला आहे.
निधीअभावी शहरातील रखडलेल्या हातोडा पाणीपुरवठा योजनेच्या निधी करिता बुधवारी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली होती. त्यांनी योजनेची माहिती जाणून सकारात्मक चर्चा करत पुढच्या महिन्यात प्रत्यक्ष तळोदा येथे येऊन आढावा घेण्याचे सांगून हा प्रश्न मार्गी लावण्याचे सांगितले.
- जितेंद्र दुबे, शिवसेना तळोदा शहर प्रमुख.