म्हसावद ते खेतिया फाट्यावर वृक्षतोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:32 IST2021-04-02T04:32:09+5:302021-04-02T04:32:09+5:30
म्हसावद : म्हसावद ते खेतिया फाट्यादरम्यानची हिरवीगार झाडे रात्रीतून गायब होत असल्याचे दिसून येत आहे. रात्रीतून झाड पडल्याचा देखावा ...

म्हसावद ते खेतिया फाट्यावर वृक्षतोड
म्हसावद : म्हसावद ते खेतिया फाट्यादरम्यानची हिरवीगार झाडे रात्रीतून गायब होत असल्याचे दिसून येत आहे. रात्रीतून झाड पडल्याचा देखावा करायचा आणि दिवसा येऊन झाडे तोडून न्यायची, असा गंभीर प्रकार चार ते पाच महिन्यापासून सुरू असून, ५०च्यावर झाडांची फक्त खोडेच शिल्लक राहिली आहेत. कोण्या बड्या अधिकाऱ्याला हाताशी धरून निसर्गाला बोडके करण्याचा गंभीर खेळ सुरू आहे.
एरवी रस्त्यावरील झाडांना रंग लावून झाडांवर अधिकार दाखवणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सुस्त झाले आहेत, की डोळे असून आंधळ्याचे सोंग घेत आहेत. वनविभागाला रस्त्यावरील तुटलेली झाडेच दिसत नाहीत ही विशेष गोष्ट आहे.
म्हसावद ते खेतिया फाट्यावरील झाडे तोडण्याचा प्रकार एकमेकांच्या हातात हात घालून सुरू आहे. वादळ वारा आला की, रात्रीतून एक-दोन झाड पडतात. मात्र संबंधित झाडे तोडणारा रात्रीतून पाच ते सहा झाडे जेसीबी मशीन लावून फांद्या मोडून वेड्यावाकड्या स्थितीत फेकून देतो. यावेळी वादळ वाऱ्याने रात्रीतून झाड मोडले असा देखावा केला जातो व दुसऱ्या दिवशी सकाळी रस्ता मोकळा करण्याच्या नावाखाली सर्व पडलेली झाडे तोडून नेतो व विक्री करीत असल्याचा गंभीर प्रकार सुरू असूनही सार्वजनिक बांधकाम विभाग, वनविभाग सुस्त का? की काही लांगेबांधे आहेत याची चौकशी करावी, असा प्रश्न परिसरातील वन्यप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.
वादळ वारा संपला तरीही आता दिवसाढवळ्या झाडे तोडली जात आहेत. रस्त्याच्या कडेला लागून असलेली ५० वर्षांपूर्वीची झाडेही शेतकरीच्या बांधावरील झाडाच्या नावाखाली तोडली जात आहे. बाभूळ, वारूळ, कडुनिंब या वृक्षांची कत्तल केली जात आहे. म्हसावद ते खेतिया फाटादरम्यान रस्त्यावरील झाडे कोणी कापून नेली याचा शोध घेणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकऱ्याच्या बांधावरील झाडाच्या नावाखाली राहिलेली झाडेही गायब होण्याची शक्यता आहे.