केळीची रोपे खराब निघाल्याने शेतकऱ्याची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:21 IST2021-06-21T04:21:06+5:302021-06-21T04:21:06+5:30

याबाबतचे वृत्त असे की, मे महिन्यात खरीप हंगामात शहादा तालुक्यातील लोणखेडा येथील शेतकरी भटू पुरुषोत्तम सोनार यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील ...

Deception of farmers due to bad banana seedlings | केळीची रोपे खराब निघाल्याने शेतकऱ्याची फसवणूक

केळीची रोपे खराब निघाल्याने शेतकऱ्याची फसवणूक

याबाबतचे वृत्त असे की, मे महिन्यात खरीप हंगामात शहादा तालुक्यातील लोणखेडा येथील शेतकरी भटू पुरुषोत्तम सोनार यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील एका कंपनीकडून आपल्या तीन एकर क्षेत्रात केळीची लागवड करण्यासाठी चार हजार टिशू कल्चर केळीची रोपे ६० हजार रुपयांत विकत घेतली होती. मोठ्या आकाराची, गोड, मजबूत बुंध्याची निर्यातक्षम केळीची रोपे असल्याची कंपनीने खात्री दिली होती. पीक पूर्ण होईपर्यंत खते, मशागत व पीक संरक्षण याबाबत संपूर्ण मार्गदर्शन कंपनी करणार होती. भटू सोनार यांनी आपल्या नवलपूर शिवारातील तीन एकर क्षेत्रात २५ मे रोजी केळीच्या रोपांची लागवड केली. परंतु गेल्या २० दिवसांत केळी रोपांना पाण्यासह लक्षपूर्वक राखण केली. परंतु रोपे वाळली असून रोपे मरू लागली आहेत. त्यामुळे खराब रोपे देऊन संबंधित कंपनीने फसवणूक केल्याचा आरोप या शेतकऱ्याने केला आहे.

तक्रारीकडे दुर्लक्ष

शेतकरी भटू सोनार यांनी केळीची रोपे महिनाभरातच वाळायला लागली व रोपे वाळण्याचे कारण काय याबाबत मार्गदर्शनासाठी संबंधित एजंटसह कंपनीलादेखील संपर्क केला. परंतु संबंधित शेतकऱ्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे.

नुकसानभरपाईची मागणी

तीन एकर क्षेत्रात चार हजार रोपांची लागवड केली होती. त्यात प्रति रोप १५ रुपये असा एकूण ६० हजार रुपयांचा रोपांसाठी खर्च व लागवडीसाठी १० ते १५ हजार रुपये खर्च असा ७० ते ७५ हजार रुपयांचा खर्च शेतकऱ्याने केला होता. त्यात रोपे वाळून (जळून) शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे. संबंधित कंपनीवर कृषी विभागाने कारवाई करून नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.

कर्ज काढून शेतात केळी रोपांची लागवड करण्यात आली होती. परंतु संबंधित कंपनीने खराब रोपे पाठवून फसवणूक केली आहे. याबाबत या कंपनीला खराब झालेल्या रोपांची माहिती दिली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत. मला रोपांसह लागवडीसाठी ७० ते ७५ हजार रुपये खर्च झाला असून नुकसानभरपाई देण्यात यावी.

- भटू पुरुषोत्तम सोनार, शेतकरी, लोणखेडा, ता. शहादा

Web Title: Deception of farmers due to bad banana seedlings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.