धुरखेड्यात मृत कावळे आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:32 IST2021-02-10T04:32:18+5:302021-02-10T04:32:18+5:30
नवापूर येथे बर्ड फ्लू समाेर आल्याने युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत. दरम्यान, मंगळवारी दुपारी पाच वाजेच्या सुमारास धुरखेडा गावातील ...

धुरखेड्यात मृत कावळे आढळले
नवापूर येथे बर्ड फ्लू समाेर आल्याने युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत. दरम्यान, मंगळवारी दुपारी पाच वाजेच्या सुमारास धुरखेडा गावातील एका शेताजवळ व परिसरात कावळे मृत अवस्थेत असल्याचे आढळून आल्यानंतर धुरखेड्याचे सरपंच गणेश चौधरी यांनी वनविभागाला माहिती दिली. यानुसार वनपाल दीपक परदेशी, सुभाष मुकडे, डी.डी. पाटील, वन्यजीव संरक्षण संस्थेचे सागर निकुंभे व ग्रामस्थांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी या ठिकाणी २०पेक्षा अधिक कावळे मृत अवस्थेत आढळून आले. वनविभागाच्या पथकाने मृत कावळे गोळा करून तपासणीसाठी मुंबई येथील प्रयोगशाळेत पाठवले आहेत. तपासणी अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. अचानक एकाच वेळी २० कावळे मृत आढळून आल्याने गावात चिंता आणि भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, वनविभागामार्फत बुधवारी संपूर्ण परिसरात तपासणी केली जाणार असून आणखी काही कावळ्यांचे मृतदेह परिसरात आढळून येतात का, याबाबत विशेष पाहणी केली जाणार आहे. दिवसभर या घटनेची चर्चा होती. तालुक्यात बर्ड फ्लूची लागण अद्याप झालेले नाही. मात्र घटनेमुळे प्रशासन सतर्क झाले आहे. येत्या आठवड्यात प्रयोगशाळेतून अहवाल आल्यानंतर कावळ्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती वनक्षेत्रपाल सचिन खुणे यांनी दिली आहे.