धवळीविहीर-हलालपूर रस्त्यावरील पुलाला भगडाद पडल्याने वाहतुकीला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 12:43 IST2020-06-14T12:43:42+5:302020-06-14T12:43:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा तालुक्यातील धवळीविहीर ते हलालपूर दरम्यान असलेल्या नदीवरील पुलाला पडलेलं भगदाड वर्षभरानंतरदेखील ‘जैसे थे’च ...

Danger to traffic due to collapse of bridge on Dhavalivihir-Halalpur road | धवळीविहीर-हलालपूर रस्त्यावरील पुलाला भगडाद पडल्याने वाहतुकीला धोका

धवळीविहीर-हलालपूर रस्त्यावरील पुलाला भगडाद पडल्याने वाहतुकीला धोका

लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : तळोदा तालुक्यातील धवळीविहीर ते हलालपूर दरम्यान असलेल्या नदीवरील पुलाला पडलेलं भगदाड वर्षभरानंतरदेखील ‘जैसे थे’च आहे. यंदाच्या पावसाळ्यात नदीला पूर आल्यास धवळीविहीर गावाचा तालुका व मुख्यालयाशी संपर्क तुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पुलाची तत्काळ दुरूस्ती न झाल्यास धवळीविहीर ग्रामस्थांकडून आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्यावर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे तळोदा तालुक्यातील धवळीविहीर ते हलालपूर दरम्यान असणाऱ्या नदीवरील पुलाला भले मोठे भगदाड पडले होते. या पुलाची उंची कमी असल्याने व गेल्यावर्षी सातत्याने झालेल्या मुसळधार पावसामुळे सुमारे महिनाभर पुलावरून पाणी वाहत होते. अश्या परिस्थिती या पुलाला पडलेले हे जीवघेणे भगदाड अधिकच धोकेदायक बनले होते. पुलावरील वाहत्या पाण्यात रस्त्याचा अंदाजा घेत व त्या भगदाडला चुकवीत धवळीविहीर ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी महिनाभर प्रवास केला होता.
नदीचे पाणी कमी झाल्यानंतर पुलावरून वाहणारे पाणी बंद झाले मात्र पुराच्या पाण्यामुळे पुलाला मोठे भगदाड पडल्याने पुलाचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यामुळे धवळीविहीर ग्रामस्थांना तारेवरची कसरत करीत व जीव मुठीत घेऊन अनेक दिवस पुलावरून मार्गक्रमण करावे लागले. पुलावरून वाहणारे पाणी बंद झाल्यावरदेखील पुलावरून प्रवास करणे हे तेवढेच धोकेदायक होते. असे असतांनाही वर्षभर धवळीविहीर ग्रामस्थांनी या धोकेदायक पुलावरून मार्गक्रमण केले. पुलाला पडलेले हे जीवघेणे भगदाड बुजवून पुलाची दुरूस्ती केली जाईल, अशी ग्रामस्थांना अपेक्षा होती. मात्र वर्ष उलटूनही या पुलाच्या दुरूस्तीसाठी प्रत्यक्ष कोणत्याच प्रकारचे काम न झाल्याने ग्रामस्थांची अपेक्षा फोल ठरली आहे.
दरम्यान, या पुलाला पडलेला हा जीवघेणी खड्डा सहज वाहनधारकांच्या लक्षात येत नसल्याने या खड्यात वाहनधारक पडू नये म्हणून कचºयाचे ढीग टाकून हे भगदाड बुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र कचºयाने हे भगदाड बुजविणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यावर पुलाच्या मार्गावर कचºयाचा ढीग करून पुलावरून जाणारा मार्गच बंद करण्यात आला होता. मात्र धवलीविहीर ग्रामस्थांनी रस्ता नसल्याने या धोकेदायक पुलावरून मार्गक्रमण करण्याचा धोका पत्करून मार्गावरील कचºयाचा ढीग हटविण्यात आला होता व रहदारीसाठी मार्ग मोकळा करण्यात आला होता.
पुलाला पडलेले हे भगदाड वर्ष होवूनही त्याच स्थितीत असून, या नदीला पुन्हा पावसाळ्यात पूर आला तर धवळीविहिर ग्रामस्थांचा तालुका व मुख्यालयाशी संपर्क तुटणार आहे. धवळीविहीर ग्रामस्थांना तळोदा येथे येण्यासाठी गणेश बुधावल फाटा एक दुसरा कच्चा मार्ग आहे. परंतु तो मातीचा रस्ता असल्याने पावसाळ्यात याठिकाणी चिखल साचत असल्याने तो कोणत्याही उपयोगाचा ठरत नाही. मोटरसायकल सुद्धा या मार्गाने व्यवस्थित जाऊ शकत नाही. अशा परिस्थिती या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्यपूर्व लक्ष देणे गरजेचे होते. परंतु अद्यापपर्यंत कोणत्याही अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी या पुलाच्या दुरवस्थेकडे गांभीर्याने पाहिलेले नाही, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. या पुलाची तात्काळ दुरूस्ती न केल्यास धवळीविहीर ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे सांगितले जात आहे.


तालुका व मुख्यालयाच्या ठिकाणी जाण्यासाठी धवळीविहीर ते हलालपूर दरम्यान असणाऱ्या नदीवरील पुलाचा एकमेव मार्ग आहे. मात्र या पुलाला पडलेल्या भगदाडामुळे पावसाळ्यात तालुक्याशी आमचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे. तसेच या भगदाडमुळे जीवितहाणी घडण्याची शक्यता नाकाता येत नाही. त्यामुळे संबंधितांनी याकडे दुर्लक्ष न करता तत्काळ या पुलावरील भगदाड त्वरित बुजवून धवळीविहीर व हलालपूर वासीयांना सोयीचे करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे. -सुभाष पावरा, ग्रामस्थ, धवळीविहीर, ता.तळोदा

Web Title: Danger to traffic due to collapse of bridge on Dhavalivihir-Halalpur road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.