स्थलांतरीत मजुरांना आणण्यासाठी दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 12:41 IST2019-12-26T12:41:39+5:302019-12-26T12:41:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा तालुक्यातून मजुुरांची मोठ्या प्रमाणावर स्थलांततर झाले आहे. त्याचा परिणाम जिल्हा परिषद निवडणुकीवर होणार ...

स्थलांतरीत मजुरांना आणण्यासाठी दमछाक
लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : तळोदा तालुक्यातून मजुुरांची मोठ्या प्रमाणावर स्थलांततर झाले आहे. त्याचा परिणाम जिल्हा परिषद निवडणुकीवर होणार असल्याचे स्पष्ट आहे. काहीजण अजूनही स्थलांतर करीत आहेत. स्थलांतराच्या तयारीत असणाऱ्या मतदारांना रोखण्यासाठी व स्थलांतरित झालेल्या मतदारांना मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष हजर करण्यासाठी इच्छुकांची दमछाक होणार असल्याचे चित्र आहे.
तळोदा हा आदिवासीबहुल तालुका असून दरवर्षी रोजगाराच्या शोधासाठी तालुक्यातून शेकडो कुटूंबीय शेजारील गुजरात राज्यात स्थलांतर करीत असतात. साधारणत: दिवाळीनंतर मजुरांच्या या स्थलांतराला वेग येतो. इतर वेळी दुर्लक्षित राहणारा मजुरांचे स्थलांतर हा मुद्दा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा मुद्दा ठरू लागला आहे. कोणत्या गावातून किती मतदार स्थलांतरित झाले आहेत यांचा आढावा राजकीय पक्ष व इच्छुकांकडून घेण्यात येत आहे. मतदारांच्या स्थलांतरामुळे अनेकांची राजकीय समीकरणे बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदारांचे यावर्षी झालेले स्थलांतर इच्छुकांसह राजकीय पुढारी व लोकप्रतिनिधींची चिंता वाढविणारे ठरले आहे.
तालुक्यातील एका गावातून सरासरी ८० ते १०० च्या जवळपास मतदार स्थलांतर झाले असल्याचे सांगितले जाते. सर्वाधिक स्थलांतर हे तालुक्याच्या सातपुड्याच्या पायथ्याशी लागून असणाºया आदिवासीबहुल गावा मधून झाले आहे. त्यात नर्मदानगर, अमोनी, अंमलपाडा, बुधावल, प्रतापपूर, धनपूर या गणांचा समावेश आहे. या परीसरातील गावातून मोठ्या संख्येने मतदान स्थलांतर झाले असल्याचे लक्षात आल्यानंतर स्थलांतराच्या तयारीत असणाºया कुटुंबांची मनधरणी करून स्थलांतर रोखण्यासाठी इच्छुकांकडून प्रयत्न केला जात आहे. शिवाय रोजगाराच्या शोधासाठी स्थलांतरित झालेल्या मतदारांना मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष मतदानासाठी परत बोलवण्यासाठी इच्छुकांकडून मोबाईलद्वारे संपर्क करण्यात येत आहे. प्रत्यक्षात उमेदवारी निश्चित झाल्यानंतर उमेदवारांकडून स्थलांतरित मतदारांना मतदानासाठी परत आणण्याचे नियोजन देखील गावपातळीवर सुरू असल्याची चर्चा आहे. मतदानासाठी स्थलांतरित मतदारांना परत बोलवणे व स्थलांतराच्या तयारीत असणाºया कुटुंबांचे स्थलांतर रोखणे हे उमेदवारांसाठी खर्चिक ठरण्याबरोबर व उमेदवारांची दमछाक करणारे देखील आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी तालुक्यात उमेदवारांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. मात्र, 'मतदारांचे स्थलांतर' हा मुद्दा आडकाठी ठरला आहे. तळोदा तालुक्यात जिल्हा परिषदेचे पाच गट तर पंचायत समितीचे एकूण दहा गण आहेत. सर्वच गट व गणात मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
निवडणुकीच्या तोंडावर रोजगारासाठी मतदारांचे झालेले हे स्थलांतर कोणाच्या पथ्यावर पडते व मतदारांच्या स्थलांतराचा फटका नेमका कोणाला बसतो हे मात्र मतमोजणीच्या दिवशी स्पष्ट होईल.
स्थलांतरीत मजुरांना परत आणण्यासाठी उमेदवारांची कसरत होणार आहे. आतापासूनच उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते मजुरीसाठी गेलेल्या मतदारांचा पत्ता मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काही ठिकाणी मजुरांना आणण्याकरीता आतापासूनच नियोजन करून संबधितांना त्यासाठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याशिवाय मजुर ठेकेदारांनाही विनंती करण्यात येत आहे. स्थलांतर मजुरांचे मतदान मोठ्या संख्येने आहे. ते मतदान निर्णायक देखील ठरू शकते. ही बाब लक्षात घेता प्रत्येकजण त्यासाठी काळी घेत आहे.