वादळ व पावसाने केळी व पपईचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:29 IST2021-05-17T04:29:32+5:302021-05-17T04:29:32+5:30

नंदुरबार : जिल्ह्यात वादळ आणि पावसाने अनेक ठिकाणी नुकसान केले. शहादा व नंदुरबार तालुक्यातील अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडाले, ...

Damage to bananas and papayas due to storms and rains | वादळ व पावसाने केळी व पपईचे नुकसान

वादळ व पावसाने केळी व पपईचे नुकसान

नंदुरबार : जिल्ह्यात वादळ आणि पावसाने अनेक ठिकाणी नुकसान केले. शहादा व नंदुरबार तालुक्यातील अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडाले, झाडे उन्मळून पडली. शहादा तालुक्यात केळी व पपई पिकांचे मोठे नुकसान झाले. पावसामुळे मात्र वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

जिल्ह्यात दोन दिवसांपासून वातावरणात ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. रविवारी दुपारी अचानक ढगांच्या गडगडाटात आणि वादळात पावसाला सुरुवात झाली. शहादा, नंदुरबार व तळोदा तालुक्यात अधिक जोर होता. त्यामुळे पपई व केळी पिकांना त्याचा फटका बसला.

नंदुरबार बाजार समितीत असलेल्या भुईमुग शेंगा, मका, गहू उघड्यावर होता त्याला पावसाचा काही प्रमाणात फटका बसला आहे. नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागातील केळी व पपई या पिकांचे मोठे नुकसान झाले. वादळ व पावसामुळे मात्र वीजपुरवठा दिवसभरात वारंवार खंडित होत होता.

शहाद्यात वृक्ष उन्मळून पडले

शहरात दुपारी चार वाजेच्या सुमारास जोरदार वादळासह हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. त्यात ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. अचानक आलेल्या वादळात शहरातील मुख्य रस्त्यावरील विकास हायस्कूलजवळ लिंबाचे मोठे झाड उन्मळून रस्त्यावर पडले. तसेच खेतिया रस्त्यावरील एका दुकानाचे पत्रे उडाले. दरम्यान, सुदैवाने कुठेही जीवितहानी झाली नाही.

शहरात सकाळपासूनच उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. दुपारी चार वाजेच्या सुमारास अचानक जोरदार वादळ आले. त्यात शहरातील विकास हायस्कूल व शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या आवारामधून जाणाऱ्या रस्त्यावर लिंबाचा वृक्ष उन्मळून पडला. त्यात मुख्य वीजवाहिनी व उपवाहिनीच्या तारा तुटल्या. विद्यालयाचे प्राचार्य आय.डी. पाटील यांनी तत्काळ प्रसंगावधान राखून वीज वितरण कंपनीला कळविले. उपअभियंता सुजीत पाटील, भरत पाटील यांनी रस्त्यावर उन्मळून पडलेला वृक्ष आपल्या जेसीबी मशीनचा साहाय्याने रस्त्याच्या कडेला लावून रस्ता रहदारीस खुला केला. सुदैवाने जनता कर्फ्यू असल्याने रस्त्यावर कुठलीही रहदारी नव्हती. खेतीया रस्त्यावर पत्र्याची शेड वाऱ्यामुळे कोसळली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातही वृक्ष उन्मळून पडला.

जयनगरसह परिसरातील वडाळी, कोंढावळ, बोराळे, कुकावल, कोठली, बामखेडा परिसरात जोरदार वादळाचा तडाखा बसला आहे. जयनगर येथील नितीन उत्तम माळी, विनोद संतोष माळी यांच्या शेतातील केळीबागेचे केळीच्या घडासहित झाडे पूर्ण जमीनदोस्त झाली आहेत. त्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेक शेतकरी पपई पिकाची लागवड करत होते, त्यांचेही मोठ्या प्रमाणावर रोपे उडून गेल्याने नुकसान झाले आहे.

वादळासोबत हलक्या पावसाच्या सरीही या परिसरात कोसळल्या. पाऊस खूप मोठ्या प्रमाणावर नसला तरी वादळामुळे पिकांसह अनेक घरांचे पत्रेदेखील उडाले आहेत. येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राजवळ असलेल्या वीस-पंचवीस वर्षांपूर्वीचा बीएसएनएल जोडणीचा टॉवरदेखील जवळच्या पत्र्याच्या चावडीवर पडला आहे.

मूग पिकाचा हाताशी आलेला घास उडाला

जयनगर येथे ज्या शेतकऱ्यांनी उन्हाळी मुगाची पेरणी केली होती, त्यांनी परिपक्व झालेले मूग शेंगासहित कापून झाडांचे छोटे-छोटे ढिगारे करून काढणीसाठी सुकवायला ठेवले होते. हे सगळे मूग जोरदार वादळाच्या तडाख्यामुळे उडाले असून त्या शेतकऱ्यांच्या शेतात एकही मुगाचे ढिगारे शिल्लक दिसत नाहीत. हातातोंडाशी आलेला घास वाऱ्यात उडाल्याने शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.

Web Title: Damage to bananas and papayas due to storms and rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.