जामनपाडा शिवारात केळी पिकाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:31 IST2021-05-21T04:31:48+5:302021-05-21T04:31:48+5:30

चार दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे नवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. आंबा, केळी, कापून ठेवलेले मुगाचे पीक व ...

Damage to banana crop in Jamanpada Shivara | जामनपाडा शिवारात केळी पिकाचे नुकसान

जामनपाडा शिवारात केळी पिकाचे नुकसान

चार दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे नवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. आंबा, केळी, कापून ठेवलेले मुगाचे पीक व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तालुक्यातील जामनपाडा गावातील देसमा रत्ना गावित यांनी आपल्या अडीच एकर क्षेत्रामध्ये तीन हजार ६०० केळीची रोपे लावली होती. वर्षभर मोठ्या मेहनतीने केळी पिकाची काळजी घेत खत, पाणी व्यवस्थापन करून केळी पीक फळधारणेसाठी तयार झाले होते. परंतु, चक्रीवादळामुळे जामनपाडा येथील देसमा गावित यांच्या केळी पिकाला मोठा फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेले केळीचे पीक पूर्णपणे भुईसपाट झाले आहे. उत्पन्न निघण्याच्या आधीच वादळामुळे केळी पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ येऊन ठेपली असून, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

चक्रीवादळामुळे अडीच एकर क्षेत्रावरील अर्धे केळी पीक भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त हतबल झालेल्या शेतकऱ्याने नुकसानीबाबत महसूल व कृषी विभागाशी संपर्क साधला. परंतु, ते अद्यापही पंचनामे करण्यासाठी आलेले नाहीत. त्यामुळे तलाठी व कृषी अधिकाऱ्यांनी त्वरित नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: Damage to banana crop in Jamanpada Shivara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.