अक्कलकुवा शहरातील गर्दी ठरतेय डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:30 IST2021-04-24T04:30:32+5:302021-04-24T04:30:32+5:30
अक्कलकुवा : शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना सातत्याने होणारी गर्दी संसर्गासाठी ...

अक्कलकुवा शहरातील गर्दी ठरतेय डोकेदुखी
अक्कलकुवा : शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना सातत्याने होणारी गर्दी संसर्गासाठी कारणीभूत ठरत आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे. अक्कलकुवा शहरामध्ये दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत असताना शहरात गर्दी होणाऱ्या ठिकाणी योग्य ते नियोजन स्थानिक प्रशासनाने करावे, असे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. परंतु, असे असतानाही येथील मुख्य बाजारपेठेत दररोज तोबा गर्दी होत असल्याचे भयावह चित्र दिसत आहे. शहरातील सर्व ठिकाणी भाजीपाला खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. तसेच गुरुवार ते रविवार कडक निर्बंध उठल्यानंतर सोमवार, मंगळवार यादिवशी मोठ्या प्रमाणावर भाजीपाला खरेदीसाठी गर्दी होते. दररोज होणारी ही गर्दी टाळण्यासाठी शहरातील प्रत्येक प्रभागाच्या परिसरामध्ये भाजीपाला विक्रीची व्यवस्था करण्याची अत्यंत गरज असताना याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. गेल्यावर्षी कोरोनाचे रुग्ण अत्यल्प असताना याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये स्वतंत्रपणे रिकाम्या मैदानांवर सामाजिक अंतर ठेवून भाजीपाल्याची दुकाने थाटण्यात आली होती. मात्र, सद्यस्थितीत शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण दररोज आढळत असतानाही भाजीपाला बाजारात दररोज होणारी गर्दी टाळण्यासाठी याकडे प्रशासनाने अद्यापही दुर्लक्ष केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत वरिष्ठांनी गांभीर्याने लक्ष देऊन शहरातील भाजीपाला बाजार वेगवेगळ्या प्रभागांमध्ये थाटण्यासाठी तालुका प्रशासनाला त्वरित आदेश देण्यात यावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
शहरांमधील मुख्य भाजीपाला बाजारात दररोज भाजीपाला घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. कुठल्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंग ग्राहकांमध्ये दिसून येत नसल्यामुळे कोरोना महामारीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढण्यास ही गर्दीदेखील कारणीभूत ठरू शकते, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अन्यथा याचे गंभीर परिणाम होतील, तरी तातडीने याबाबत प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे आहे.