कारवाईच्या भीतीने गर्दी थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:30 IST2021-03-18T04:30:25+5:302021-03-18T04:30:25+5:30
नंदुरबार : जिल्हाधिकारी यांनी गर्दी होईल, असे कार्यक्रम उपाययोजनांसह सुरू ठेवण्याचे आदेश काढले आहेत. या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरातील बाजारपेठेत ...

कारवाईच्या भीतीने गर्दी थांबली
नंदुरबार : जिल्हाधिकारी यांनी गर्दी होईल, असे कार्यक्रम उपाययोजनांसह सुरू ठेवण्याचे आदेश काढले आहेत. या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरातील बाजारपेठेत येणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. दुसरीकडे लग्नसोहळे आणि अंत्यविधीच्या गर्दीतही घट आल्याचे दिसून आहे. कारवाई आणि कोरोना या दोघांच्या भीतीने ही स्थिती निर्माण झाली आहे.
शहरात तीन दिवसात सुमारे ७०० रुग्ण समोर आले असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. यातून विविध उपाययोजना करत कामकाज सुरू करण्यात आले आहे. सर्वच ठिकाणी गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती यावेळी नागरिक व व्यावसायिकांनी दिली.
अद्याप कारवाई नाही
जिल्हाधिकारी यांनी मंगळवारी सायंकाळी आदेश काढल्यानंतर बुधवारी शहरातील विविध भागात फिरून आढावा घेतला होता. यात सर्वच ठिकाणी नियमांचे पालन झाल्याचे दिसून आले.
दरम्यान, शहर व उपनगर पोलिसांच्या हद्दीत प्रत्येकी दोघांवर मास्कचा वापर न केल्याने गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
चित्रपटगृहे
नंदुरबार शहरात एक एकपडदा सिनेमागृह, तर एक मल्टिप्लेक्स सिनेमागृह आहे. हे दोन्ही सध्या बंद आहेत. कोरोनामुळे संबंधित मालकांनी ते बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बंदची वर्षपूर्ती होणार आहे.
विवाह सोहळे
शहरातील मंगल कार्यालयांमध्ये भेटी दिल्या असता शुकशुकाट दिसून आला. तारखांवेळी कोरोना उपाययोजना करणार असल्याचे सांगण्यात आले. एक ठिकाणी विवाहाला तुरळक गर्दी होती.
अंत्यविधी
शहरातील साक्री नाका भागातील स्मशानभूमीत तपासणी केली असता, कोरोनामुळे मोजक्या लोकांच्या उपस्थितीतच अंत्यविधी होत असल्याचे सांगण्यात आले. याठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घेत आहेत.
कार्यालये
शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालय, बाजार समिती याठिकाणी नियमांचे पालन होत आहे. केवळ बँकांमध्ये मात्र सकाळपासून गर्दी असल्याचे दिसून आले. याकडे बँकांनीच लक्ष देण्याची अपेक्षा आहे.
गृह विलगीकरण
शहरातील विविध भागात दर दिवशी किमान एक किंवा त्यापेक्षा अधिक रुग्ण समोर येत आहेत. या रुग्णांचे वास्तव्य असलेल्या घराबाहेर बोर्ड लावण्याचा मात्र संबंधित विभागाला विसर पडला आहे.