लसीकरणाचा दोन लाखांचा टप्पा पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:29 IST2021-05-15T04:29:38+5:302021-05-15T04:29:38+5:30

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना लसीचे दोन लाख डोस देण्यात आले आहेत. त्यापैकी १ लाख ६२ हजार ६७४ ...

Crossing the two lakh stage of vaccination | लसीकरणाचा दोन लाखांचा टप्पा पार

लसीकरणाचा दोन लाखांचा टप्पा पार

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना लसीचे दोन लाख डोस देण्यात आले आहेत. त्यापैकी १ लाख ६२ हजार ६७४ व्यक्तींना पहिला डोस, तर ४१ हजार ६८६ व्यक्तींना दुसरा डोस देण्यात आला आहे. चार महिन्यांत हा टप्पा पार करण्यात आला आहे. दरम्यान, आरटीपीसीआर स्वॅब तपासणी चाचण्यांचा देखील एक लाखाचा टप्पा पार झाला असून रॅपिड अँटिजन चाचण्यांची संख्या ६५ हजारांवर पोहोचली आहे.

जिल्ह्यात १६ जानेवारीला पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालय येथे लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला. प्रारंभाच्या दिवशी चार केंद्रांवर २६५ आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले होते.

पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले; नंतरच्या टप्प्यात कोरोना नियंत्रणासाठी काम करणारे कर्मचारी (फ्रंटलाईन वर्कर) आणि ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले. जिल्ह्याने २२ एप्रिल रोजी लसीकरणाचा एक लाखाचा टप्पा पूर्ण केला. पालकमंत्री पाडवी यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वत: लस घेऊन नागरिकांना लसीकरणासाठी आवाहन केले.

लसीकरणाची भीती घालविण्यासाठी प्रयत्न

नागरिकांच्या मनामध्ये लसीकरणाविषयी अनेक गैरसमज असल्याने प्रशासनाने जनजागृतीवर विशेष भर दिला आहे. पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार ग्रामीण भागातील लसीकरणासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेत शिक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. ग्रामीण भागातील जनजागृतीसह लाभार्थ्यांच्या नोंदणीचे कामदेखील शिक्षकांकडून करण्यात येत आहे. नागरिकांसोबत संवाद साधण्यासाठी लोककला, स्थानिक भाषा, बैठका, घरोघरी भेटी, आदी विविध माध्यमांचा उपयोग करण्यात येत आहे.

आतापर्यंत लसीकरण झालेल्या नागरिकांना कुठलाही गंभीर त्रास झालेला नाही. लसीकरण पूर्णपणे सुरक्षित आहे. कोरोना नियंत्रणासाठी लसीकरण अत्यंत आवश्यक असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले आहे.

जिल्ह्यात १३ हजार ७२१ आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला, तर सात हजार ७४९ कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. २२ हजार २२८ फ्रंटलाईन वर्कर्सनी पहिला, तर ८९७८ कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. १८ ते ४४ वयोगटातील १४ हजार २८९ व्यक्तींनी पहिला डोस घेतला आहे, तर ४५ वर्षांवरील एक लाख १२ हजार ४३६ व्यक्तींनी पहिला, तर २५ हजार १५९ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे.

एकूण उद्दिष्टाच्या ११.४ टक्के लाभार्थ्यांनी पहिला, तर २.८६ टक्के लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. आज, शुक्रवारपासून दुसरा डोस घेण्यासाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात आले आहे. ग्रामीण भागातील लसीकरण मोहिमेलादेखील अधिक गती देण्यात येणार आहे.

फिरत्या पथकांची नियुक्ती

नोंदणी झालेल्या गावांत लसीकरणासाठी फिरते पथक पाठवून शिबिरांच्या आयोजनाद्वारे लसीकरणाला गती देण्याचे यशस्वी ठरले आहेत.

यासाठी प्रशासनाने प्रत्येक तालुक्यासाठी दोन आणि अक्कलकुवा व धडगावसाठी चार वाहनांची सुविधा उपलब्ध करून दिली. आरोग्य विभागाचे कर्मचारी लसीकरणासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.

ग्रामस्तरावरील मुख्याध्यापक, शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, आशा कार्यकर्ती, अंगणवाडीसेविका, आदींचा सहभागही महत्त्वाचा ठरला. चांगले काम करणाऱ्यांना गौरविले जात आहे.

असा झाला आरटीपीसीआर चाचणीचा लाखाचा टप्पा पार

जिल्ह्यात कोरोनाच्या सुरुवातीच्या तीन महिन्यांच्या काळात जिल्ह्यात आरटीपीसीआर स्वॅब तपासणीची सोय नव्हती. त्यामुळे पुणे, नाशिक व धुळे येथून स्वॅब तपासणी केली जात होती. त्याला तीन ते पाच दिवसांचा कालावधी लागत होता. त्यामुळे संशयित व्यक्तीकडून इतरांना संक्रमणाची भीती राहत होती. ही बाब लक्षात घेता नंदुरबारात स्वतंत्र आरटीपीसीआर चाचणी केंद्र सुरू करण्यात आले. त्या आधी प्रायोगिक तत्त्वावर ट्रूनेटद्वारे देखील स्वॅब तपासणी केली जात होती.

Web Title: Crossing the two lakh stage of vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.