तिसऱ्या लाटेचे संकट; लहान मुलांचा तापही अंगावर काढू नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:28 IST2021-08-01T04:28:21+5:302021-08-01T04:28:21+5:30

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. यातून तिसरी लाट येण्याचा धोका असला तरी तत्पूर्वी लहान बालकांना ...

The crisis of the third wave; Don't even take the heat off of children! | तिसऱ्या लाटेचे संकट; लहान मुलांचा तापही अंगावर काढू नका!

तिसऱ्या लाटेचे संकट; लहान मुलांचा तापही अंगावर काढू नका!

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. यातून तिसरी लाट येण्याचा धोका असला तरी तत्पूर्वी लहान बालकांना मात्र किरकोळ आजारांनी घेरले आहे. नागरिकांनी शक्यतो लहान बालकांवरील हे आजार अंगावर काढू नयेत, तात्काळ वैद्यकीय सेवा घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

जिल्ह्यात सध्या पावसाळी आजारांनी डोके वर काढले आहे. सर्दी, खोकला, ताप यासह मलेरिया, टायफाॅइडची लागण झालेली लहान मुले आढळून येत आहेत. व्हायरल फिव्हर असलेल्या या बालकांवर उपचार सुरू आहेत. औषधी वेळेवर घेतल्यास हे आजार बरे होत असल्याने नागरिकांनी वैद्यकीय सल्ला नियमित घेत उपाययोजना कराव्यात, असेही सांगण्यात येत आहे. दरम्यान, जिल्ह्यात संभाव्य तिसऱ्या लाटेची चर्चा असली तरी आजवर एकाही बालकास कोरोनाची लागण झालेली नाही. यापुढेही लागण होऊ नये, यासाठी नागरिकांनी दक्षता घेणे गरजेचे आहे.

घाबरू नका, उपचार घ्या

सर्दी-खोकला, अंगदुखी, सांधेदुखीचे रुग्ण आजघडीस जिल्ह्यात वाढत आहेत. यातून त्यांना लक्षणानुरूप औषधी दिली जात आहे. संसर्गजन्य तापाचे प्रमाणही वाढले आहे; परंतु यातून फारसे घाबरण्याचे कारण नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहेत. योग्य उपचार-काळजी अन‌् औषधी घ्यावी. रक्तदाब कमी- अधिक झाला, तरच रुग्ण दाखल केले जात असल्याची माहिती खाजगी व शासकीय रुग्णालयातून देण्यात आली आहे.

...अशी घ्यावी काळजी

गार पाणी आणि थंड वस्तू टाळव्यात, पाणी उकळून गार करून प्यावे, आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा.

पाण्यावर डास बसणार नाहीत, याची काळजी घ्यावी, पिण्याच्या पाण्याची भांडी झाकून ठेवावीत, फ्रीजमागील पाणी काढावे.

मुलांना लक्षणे आढळून आल्यास डॉक्टरांशी संपर्क करावा. वैद्यकीय सल्ल्यानुसार विश्रांती आवश्यक आहे.

मुलांना जास्त बाहेरील वस्तू खाण्यापासून टाळावे, असेही डाॅक्टरांचे मत आहे.

ताप आला म्हणजे कोरोना,

असे नाही; पण...

पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप व अंगदुखी अशी लक्षणे नागरिकांमध्ये आढळून येतात. ही लक्षणे दिसल्याने कोरोना झाला असे समजू नये, योग्य ती काळजी घेत डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

आपल्या परिसरात व घरात सांडपाणी जमा होत असेल, तर डेंग्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोरोनाची भीती दूर ठेवून डेंग्यू होणार नाही, याबाबत काळजी घ्यावी.

दुसरी लाट ओसल्यानंतर आजअखेरीस जिल्ह्यात एकाही लहान मुलाला काेरोना आढळून आलेला नाही; परंतु व्हायरल फिव्हर, टायफाॅइड, मलेरिया व डेंग्यूची लागण झालेली मुले खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

सर्दी, खोकला, अंगदुखीचे सर्वाधिक रुग्ण जिल्ह्यात आढळून येत आहे. यात सर्दी-खोकल्याचे रुग्ण २५ ते ३० टक्के, तर डेंग्यू-मलेरियाने बाधित साधारणत: ४ ते ५ टक्के रुग्ण आहेत.

काळजी घेणे गरजेचे

किरकोळ आजारांची लागण होऊ नये, यासाठी नागरिकांनी घर आणि परिसरात स्वच्छता पाळली पाहिजे. बालकांचे लसीकरण वेळेत करून घेतले पाहिजे. फ्ल्यूची एक नवीन लस बाजारात आहे, तीपण दिली गेली पाहिजे.

-डाॅ. भूषण पाटील,

बालरोगतज्ज्ञ

Web Title: The crisis of the third wave; Don't even take the heat off of children!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.