खतांच्या वाढत्या किमतीमुळे शेतकऱ्यांवर संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:31 IST2021-05-19T04:31:41+5:302021-05-19T04:31:41+5:30
खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी खत कंपन्यांनी रासायनिक खतांच्या किमतीत मोठी दरवाढ केली आहे. कोरोना काळात आधीच लॉकडाऊनने बेजार असलेल्या ...

खतांच्या वाढत्या किमतीमुळे शेतकऱ्यांवर संकट
खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी खत कंपन्यांनी रासायनिक खतांच्या किमतीत मोठी दरवाढ केली आहे. कोरोना काळात आधीच लॉकडाऊनने बेजार असलेल्या शेतकऱ्यांना ही दरवाढ दुष्काळात तेरावा महिना ठरणारी आहे. त्यामुळे पेरणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. त्यातच या दरवाढीने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या वेदना यावर्षीही कमी होताना दिसत नाहीत. आधी बोंडअळी, दुष्काळ, अतिवृष्टी, कोरोना, लॉकडाऊन, संचारबंदी आणि आता रासायनिक खतांची दरवाढ केल्याने यावर्षी शेतकर्यांचे आर्थिक गणितच कोलमडणार असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी नवनवीन संकटांचा सामना करावा लागत आहे.
मागील दोन-तीन वर्षात अस्मानी व सुलतानी संकटाने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेले पाहावयास मिळत आहेत. विशेष म्हणजे लॉकडाऊनमुळे खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या शेतमालाला अपेक्षित भाव मिळाला नाही. त्यामुळे हजारो रुपयांचा खर्च करूनही शेतकऱ्यांच्या हाती कवडीही शिल्लक नाही. परिणामी गेल्यावर्षीसारखेच यावर्षी खरीप हंगामात पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना बँकांच्या दारात पीक कर्जासाठी खेटे घालावे लागत आहेत. त्यातच कंपन्यांनी रासायनिक खतांच्या किमतीत मागील वर्षाच्या तुलनेत भरमसाट वाढ केली आहे. काही ग्रेडच्या खतांमध्ये ५०० रुपयांपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर पुन्हा एक नवीन संकट उभे राहिले आहे. या काळात खताची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून बहुतांश शेतकरी पावसाळ्यापूर्वीच खतांची खरेदी करतात. मात्र यावेळी शेतकऱ्यांना खत खरेदी करताना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.
महागाई गगनाला
पावसाच्या लहरीपणामुळे मागील चार-पाच वर्षांपासून शेतमालाच्या उत्पादनात सातत्याने घट होत असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित दरवर्षीच बिघडत आहे. काही शेतकऱ्यांचे उत्पादन आले, तर मालाला भाव नाही. दुसरीकडे महागाई गगनाला भिडत असताना शेतीउपयोगी वस्तूंची दरवाढ दरवर्षी पाहावयास मिळते. एकंदरीत अतिवृष्टी, पीक कर्जासाठी बँकांच्या दारात रांगा, वाढती महागाई आणि आता खतांचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भरच पडली आहे.
खताची दरवाढ शेतकऱ्यांच्या मुळावर...
शहादा तालुक्यामध्ये चार-पाच वर्षांपासून पावसाचा लहरीपणा आणि यावर्षीपासून तर कोरोनामुळे लॉकडाऊन, संचारबंदी, तसेच बाजार समितीत्याही काही काळ बंद पडल्यामुळे उत्पादित मालाची विक्री करता येत नव्हती. त्यातच भर म्हणून की काय, खतांच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर बनला आहे. अजूनही कृषी दुकानदारांची गेल्यावर्षीची उधारी वसूल झालेली नाही. खतांमध्ये झालेली भाववाढ ही शेतकर्यांच्या एकप्रकारे मुळावरच आलेली आहे. खतांची भाववाढ कमी करण्यात यावी, अशी मागणी शहादा तालुक्यातील शेतकरी करीत आहेत.