गर्दीचे उल्लंघन केल्याने गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 11:48 IST2020-06-12T11:47:57+5:302020-06-12T11:48:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नगरसेवक पूत्राच्या लग्नाच्या स्वागत समारंभातील गर्दी असल्याचे पुरावे मिळाल्याने चौकशी समितीचे सदस्य तथा तहसीलदार ...

गर्दीचे उल्लंघन केल्याने गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नगरसेवक पूत्राच्या लग्नाच्या स्वागत समारंभातील गर्दी असल्याचे पुरावे मिळाल्याने चौकशी समितीचे सदस्य तथा तहसीलदार यांनी आयोजक नगरसेवकावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी मर्यादेपेक्षा अधीक जणांनी गर्दी केल्याचा हा जिल्ह्यातील पहिला गुन्हा ठरला आहे. त्यामुळे लग्न समारंभ, अंत्ययात्रा तसेच स्वागत समारंभांमधील गर्दीवर आळा बसेल अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त होत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून राजकीय रंग चढलेल्या या प्रकरणाची चर्चा जिल्हाभर सुरू होती. भाजप, मनसे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती. प्रातांधिकारी वसुमना पंत यांनी तहसीलदार व शहर पोलीस ठाण्याचे निरिक्षक यांची चौकशी समिती नेमली होती. चौकशी समितीच्या हाती आलेल्या माहितीवरुन व पुराव्यावरून मर्यादेपेक्षा अधीक गर्दी झाल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील संचारबंदी आदेश आणि साथ रोग प्रतिबंधक कायदा व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याबद्दल तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.
परवेज खान यांनी ३० जून पर्यंत मनाई आदेश लागू असताना सदर आदेशाचा भंग करून मौजे झराळी येथील फार्म हाऊसवर मुलाच्या लग्न समारंभानिमित्त ७ जून रोजी स्नेह भोजनाचे आयोजन केले होते. कार्यक्रमास ५० व्यक्तिंची परवानगी असताना त्यापेक्षा अधिक व्यक्तिंना आमंत्रित करण्यात आले होते. अशाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असल्याने आणि संसर्गजन्य आजार पसरून मानवी जिवीतास धोका उत्पन्न होण्याची ही कृती असल्याने प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेऊन तहसीलदार थोरात यांनी फिर्याद दिली. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम आणि साथीचे रोग अधिनियम तसेच विविध कलमान्वये हा गुन्हा दाखल केला आहे.
स्नेहभोजन प्रकरणाची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉ.राजेद्र भारुड यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक नंदुबार यांची संयुक्त समिती नेमण्यात आली होती.
जिल्ह्यात कोविड-१९ च्या संसर्गावर बºयापैकी नियंत्रण असल्याने संचारबंदीत शिथीलता देण्यात आली आहे. त्याचा उपयोग केवळ अत्यावश्यक बाबींसाठी नागरिकांनी करावा. कोरोनाचा संसर्ग अधिक प्रमाणात होणार नाही यासाठी प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे. लग्न समारंभात ५० पेक्षा अधिक व्यक्तिंना आमंत्रित करू नये. रात्री ९ ते पहाटे ५ या कालावधीत घराबाहेर अनावश्यक फिरू नये. बाहेर फिरताना चेहºयावर मास्क घालावा आणि शारिरीक अंतराचे पालन करावे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे.
भाजप पदाधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी
भाजपच्या जनसंवाद रॅलीत एलईडी लावून ५० पेक्षा अधीक कार्यकर्त्यांना गोळा करणारे भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी व पदाधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करावा अशी मागणी नगरसेवकांसह इतरांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, ९ जून रोजी केंद्रीय संरक्षण मंत्री यांची जनसंवाद रॅली एलईडी लावून भाजपने कार्यकर्त्यांना ऐकण्याची सोय केली होती. त्यासाठी एका हॉटेलवर कार्यकर्ते गोळा झाले होते. त्यात सोशल डिस्टन्सिंगचे पालन झाले नाही. अनेकांनी मास्क लावले नाहीत. जिल्हा प्रशासनाची कुठलीही परवाणगी त्यासाठी घेण्यात आलेली नव्हती. यावेळी कार्यकर्त्यांना अल्पोपहार देखील देण्यात आला होता. ५० पेक्षा अधीक जण या ठिकाणी उपस्थित होते. त्यामुळे भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर नगरसेवक कुणाल वसावे, मनिषा वळवी, दिपक दिघे, रवींद्र पवार, प्रमोद शेवाळे, शारदा ढंढोरे यांच्यासह इतरांच्या सह्या आहेत, आता याबाबत काय निर्णय होतो याकडे लक्ष लागून आहे.