सुसरी धरणाचे पाणी शेतात शिरल्याने कमरेएवढ्या पाण्यात कापूस वेचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 09:31 PM2020-10-19T21:31:32+5:302020-10-19T21:31:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील सुसरी धरणातील पाणी थेट गोदीपूर ते नवलपूर रस्त्यावर आल्याने हा रस्ताच गायब ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील सुसरी धरणातील पाणी थेट गोदीपूर ते नवलपूर रस्त्यावर आल्याने हा रस्ताच गायब झाला आहे. हे पाणी शेतात जात असल्याने शेतकऱ्यांवर कमरेएवढ्या पाण्यात उतरून कापूस वेचणी करण्याची वेळ आली आहे. याकडे लोकप्रतिनिधीसह प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. रस्ता पाण्याखाली गेल्याने गोदीपूर व नवलपूर शिवारात जाण्यासाठी शेतकऱ्यांना चार ते पाच किलोमीटरचा फेरा मारुन जावे लागत आहे.
ब्राह्मणपुरी येथील शेतकऱ्यांची शेती सुसरी धरणालगत आहे. धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने धरणातील पाणी शेतशिवारात येऊन पाणी साचून पीक खराब होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. ब्राह्मणपुरी येथील शेतकरी लिमजी छगन पाटील यांचे सुसरी धरणलगत गोदीपूर शिवारात शेती आहे. त्यांनी आपल्या साडेतीन एकर क्षेत्रात कापसाची लागवड केली होती. सुसरी धरणाचे पाणी थेट शेतात साचल्याने कापूस पिकाचे नुकसान होत आहे. तर काही प्रमाणात हाताशी आलेल्या कापसाची वेचणी स्वतः शेतकऱ्यांना धरणाच्या पाण्यात जीव धोक्यात टाकून करावी लागत आहे.
१२ वर्षापासूनच्या मागणीकडे दुर्लक्ष
सुसरी धरणाच्या शेजारून शेतात जाण्यासाठी रस्ता होता. परंतु सुसरी धरण बनल्यापासून सुसरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली तर रस्ताच गायब होत असल्याने शेतकऱ्यांना चार किलोमीटरचा फेरा मारत जावे लागते. त्यामुळे हा रस्ता सुसरी धरणापासून लांब करण्याची मागणी गेल्या १० ते १२ वर्षापासून होत असून याकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
नुकसान भरपाईची मागणी
धरणाचे पाणी शेतात साचून शेतकऱ्यांचे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. काही शेतकऱ्यांना सुसरी धरणात शेती गेल्याने त्यांना त्याचा मोबदला काही प्रमाणात मिळाला तर काही शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच पेरणी केलेल्या पिकांमध्ये पाणी साचून नुकसान होते. त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचा मोबदला देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.