विवाहाचा खर्च सैनिक पाल्यांच्या शिक्षणासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 13:44 IST2020-03-15T13:43:57+5:302020-03-15T13:44:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : आर्थिक परिस्थिती सर्वोत्तम असतानाही आपल्या मुलांचा विवाह अतिशय साध्या पद्धतीने अर्थात नोंदणी पद्धतीने करून ...

The cost of marriage is for the education of soldiers | विवाहाचा खर्च सैनिक पाल्यांच्या शिक्षणासाठी

विवाहाचा खर्च सैनिक पाल्यांच्या शिक्षणासाठी

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : आर्थिक परिस्थिती सर्वोत्तम असतानाही आपल्या मुलांचा विवाह अतिशय साध्या पद्धतीने अर्थात नोंदणी पद्धतीने करून विवाहासाठी लागणारा सर्व खर्च हा शहीद सैनिकांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी दान करण्याचा निर्णय शिरूडदिगर, ता.शहादा येथील पाटील परिवाराने घेतला. अशा प्रकारे अनोख्या पद्धतीने समाजसेवा करीत समाजासमोर आदर्श त्यांनी ठेवला आहे. विशेष म्हणजे या विवाहातील वर वधू हे दोन्ही उच्चशिक्षित असून दोघेही मुंबई येथे मोठ्या पदावर कार्यरत आहेत.
शहादा तालुक्यातील शिरूड दिगर येथील येथील सेवा निवृत अभियंता विपीन देविदास पाटील यांचा एकुलता एक मुलगा मनिष यांचा विवाह मुंबई येथील डॉ. अजय नरोतम पाटील यांची कन्या वृषाली हिच्याशी समाजाच्या रितीरिवाजानुसार निश्चित झाला. एकमेकांची पसंती झाल्यानंतर लग्नाची तारीख परिवाराच्या संमतीने ठरविण्यात आली. मात्र आपला विवाह हा नोंदणी पद्धतीने व्हावा अशी विनंती मनीषने आपले माता-पिता व होणाऱ्या सासू-सासऱ्यांना केली.
विवाहासाठी लागणारा सर्व खर्च हा मला देशाच्या सेवेसाठी शहीद झालेल्या सैनिकांच्या मूलांच्या शिक्षणासाठी करावयाचा असल्याचा मानस त्याने व्यक्त केल्यानंतर नववधू वृषाली सह दोन्ही परिवाराने यास संमती दिली. त्यानंतर हा विवाह सोहळा ११ मार्च रोजी नंदुरबार येथील रजिस्टर कार्यालयात पार पडला.
कुठलीही पत्रिका नाही, नातेवाईकांना आमंत्रण नाही, लग्नाचा बडेजाव नाही की वारेमाप उधळपट्टी नाही. प्रि वेडिंग, वेडिंग व आफ्टर वेडिंग फोटोसेशन असे काही नाही. बदलत्या काळात विवाह सोहळे अतिशय दिमाखदार होत आहेत. लग्न राजेशाही पद्धधतीने व्हावे प्रत्येकाने त्याचे कायम नाव काढावे अशी इच्छा नववधू सह त्यांच्या मातापित्यांची असते. या सर्व बाबीला त्यांनी फाटा दिला.
वर मनीष हा बीई सिव्हिल एमबीए असा उच्चशिक्षित असून मुंबई येथील एका बँकेत उच्च पदावर कार्यरत आहे. दोन बहिणींचा एकुलता एक भाऊ आहे तर नववधू वृषाली ने गणित विषयात पदवीत्तर पदवी प्राप्त केली असून तिही मुंबई येथे एका कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत आहे.

युवकांचा आदर्श...
कौतुक या दोन्ही मुलांचे आहे कारण प्रत्येक लग्नाळू तरुण तरुणीला आपलं लग्न मोठ्या दिमाखात व्हावे असेच वाटते. परंतु अतिशय दुर्मिळ अशी उच्च विचारसरणी लाभलेल्या या दोन्ही मुलांना दिमाखदार सोहळ्याचे कौतुक नव्हते तर या सोहळ्यामध्ये लाखों नी होणारा खर्च वाचवून हा पैसा सत्कारणी लावावा असा त्यांचा विचार होता. संकल्प तडीस नेला म्हणून त्यांचे विशेष करावे असेच असल्याचे मत बांधकाम विभागातील सेवानिवृत्त अभियंता शरद पाटील यांनी व्यक्त केले.

विवाहांमध्ये होणारा खर्च हा सर्वसामान्यांना न परवडणारा असतो. महागाईच्या जमान्यात सर्वसामान्य कुटूंब कर्ज काढून विवाह करीत असतो. उच्च शिक्षीत युवकांनी असे आदर्श पायंडे पाडले तर नक्कीच एक वेगळा संदेश समाजात जाणार आहे. एक, दोन दिवसांचा बडेजाव कर्जाच्या खाईत लोटणारा असतो.

Web Title: The cost of marriage is for the education of soldiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.