शहादा तालुक्यात आता कोरोनाचा एकच रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 13:10 IST2020-05-17T13:10:45+5:302020-05-17T13:10:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील एकमेव कोरोना रूग्ण आता जिल्हा रूग्णालयात उपचार घेत असल्याने तालुक्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे होत ...

शहादा तालुक्यात आता कोरोनाचा एकच रुग्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : तालुक्यातील एकमेव कोरोना रूग्ण आता जिल्हा रूग्णालयात उपचार घेत असल्याने तालुक्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे होत आहे. असे असले तरी अजूनही कोरोनाचे संकट टळलेले नसल्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेणेदेखील आवश्यक आहे.
२१ एप्रिल रोजी शहाद्यात सर्वात प्रथम दोन कोरोना रूग्ण आढळल्याने शहर व तालुक्यात घबराट पसरली होती. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसात बाधित रूग्णापैकी एका तरूणाचा मृत्यू झाल्याने तालुक्यात कोरोनाचे सावट पसरले. प्रशासनाने तातडीने पावले उचलत रूग्ण सापडलेला परिसर सीलबंद करून बाधीत रूग्णाच्या संपर्कात आलेल्यांचाही शोध घेऊन तपासणी केल्याने २१ ते २५ एप्रिल दरम्यान एकूण नऊ रूग्ण आढळून आले. या सर्वांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासनाने सीलबंद परिसरात लोकांची तपासणी करून ज्या लोकांमध्ये कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आली, अशा नागरिकांना क्वॉरंटाईन करून त्यांचेवर लक्ष ठेवले.
जिल्हा रूग्णालयात उपचार घेत असलेल्या आठ कोरोना बाधीतांपैकी टप्प्याटप्प्याने सात रूग्णांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रूग्णालयातुन सोडण्यात आले. आता फक्त एका रूग्णावर उपचार सुरू असून, त्याच्या अहवालाची प्रशासनास प्रतिक्षा आहे. गेल्या १५-२० दिवसापासून तालुक्यात कोरोना रूग्ण न सापडल्याने तालुक्यात समाधानाचे वातावरण आहे. तालुक्यात कोरोनाचा आलेख सपाट झाल्याने आणि आता एकमेव रूग्ण उपचार घेत असल्याने तालुक्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरू झाली आहे.
आरोग्य व स्वच्छेता विभाग, नगर पालिका प्रशासन, महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन या सर्वांचा यात मोलाचा वाटा आहे. प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे, पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील व पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.राहुल वाघ यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली आहे. याशिवाय नागरिकांनीदेखील लॉकडाऊनचे पालन केल्याने व योग्य खबरदारी घेतल्याने कोरोनाचा संसर्ग वाढू शकला नाही. तालुक्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरू असली तरी नागरिकांनी अजूनही सावधानता बाळगणे आवश्यक आहे. तालुक्यातील कोरोनाचा आलेख सपाट झाला असला तरी संकट अजून टळलेले नसल्याने नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. लवकरच पावसाळा सुरू होणार असल्याने आणि पावसाळ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढण्याची शक्यता असल्याने पाऊस सुरू होण्यापूर्वी कोरोनाची साखळी तुटणे आवश्यक आहे. यासाठी नागरिकांनी लॉकडाऊनचे नियम पाळणे, घरात थांबणे, मास्क लावणे, स्वच्छता राखणे, आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनाला हरविण्यासाठी प्रत्येकाचे योगदान आवश्यक असल्याने प्रशासनाबरोबर नागरिकांनीदेखील कोरोना योद्धा म्हणून काम केले पाहिजे.