भावी नवरदेवांवर कोरोनाचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:31 IST2021-03-10T04:31:13+5:302021-03-10T04:31:13+5:30
आपली लाडकी लेक चांगल्या घरात जावी असे वधू पित्याला वाटते. जावईबापू नोकरीला असावा, घरी शेती, बिल्डींग, चारचाकी असावी, आपल्या ...

भावी नवरदेवांवर कोरोनाचे संकट
आपली लाडकी लेक चांगल्या घरात जावी असे वधू पित्याला वाटते. जावईबापू नोकरीला असावा, घरी शेती, बिल्डींग, चारचाकी असावी, आपल्या मुलीला सुखी ठेवील असाच जावई मुलीचे वडील शोधीत आहेत. पण शंभरात एक जावई असा सापडतो तर इतर टुक्कार, दारुडे, संशयी वृत्तीचे, अहंकारी, इगो ठासून भरलेले, बापाच्या जीवावर जगणारे व नेत्याचा जयजयकार करीत फिरणारे आसल्याने वधू पित्यांना चिंता पडली आहे. भाचा चांगला असला तरी मामी मुलगी देऊ देत नसल्याने बऱ्याच नात्यांमध्ये विघ्नही येऊ लागले आहेत. अशा एक ना आनेक समस्या मुलीच्या वडिलांसमोर आहेत. मुलगी द्यायची म्हटल्यावर नवरदेव व्यसनी आहे का? या शोधात मुलीचे वडील अनेक चौकशा करतात. त्यातून जर निर्व्यसनी मिळाला तर त्याचा विचार होतो. जर पुन्हा समजले की व्यसन करतो तर नको म्हणून निरोप येतो.
हुंडा नको फक्त मुलगी द्या हो...
मानपानाचा विचार केला तर वर पित्याकडून वरदक्षिणा, मानपान, कपडे, भांडी, अगदी सुईपासून सर्व संसारची मागणी केली जात असे. परंतु सद्यपरिस्थितीत फक्त मुलगी द्या हो... अशी विनवणी वर पित्याकडून वधू पित्याकडे होताना दिसते.
अनाथ मुलींचाही विचार करावा
वातावरण बदलत आहे त्यामुळे परिस्थितीशी जमवून घ्यायला हवे. मुलांचे लग्न जमवण्यासाठी किंवा सून म्हणून मुलगी आणण्यासाठी अनाथालयातील मुलीचा स्वीकार करावा, एका अनाथ मुलीचे भाग्य उजळावे. त्यातून समाधान मिळेल व समाजातही चांगला संदेश पोहोचेल.
वधू पित्यांनी मानसिकता बदलावी
वधू पित्याकडून नोकरदार मुलांची मागणी केली जाते. परंतु ही मानसिकता बदलायला हवी. शेतकरी, व्यावसायिक अशी मुले भरपूर आहेत. लहान-मोठा व्यवसाय करणाऱ्या मुलास मुलगी दिली तर तो नोकरदारापेक्षा सुखात ठेवू शकतो. त्यामुळे आपल्या मुलीला नोकरदारच नवरा हवा ही मानसिकता बदलायला हवी. अर्धवट शिक्षण सोडून उद्योग व्यावसायाकडे वळालेले, शेतीत काम करणारे तरूण यांचे विवाह होण्यास विलंब लागतो. मग नात्यातील मुलगी शोधली जाते. मात्र कौटुंबिक परिस्थितीमुळे मुलगी फुकट करायला तयार झाले तरी जवळचे नातलगही मुलगी द्यायला तयार होत नाहीत. अशा कारणांमुळे अनेक गावात, प्रत्येक गावात गुटखे, पानमसाला, सुपारी, तंबाखू खावून, पिचकाऱ्या मारणारे हजारो तरुण लग्नाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसून येत आहे.