कोरोनामुळे अक्षय तृतीयेच्या प्रथा, परंपरांवर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:31 IST2021-05-13T04:31:27+5:302021-05-13T04:31:27+5:30
नंदुरबार : कोरोनाचे सावट व संचारबंदीमुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास बंदी असल्याने सासुरवाशीण महिलेला अक्षय तृतीयेनिमित्त गेल्या ...

कोरोनामुळे अक्षय तृतीयेच्या प्रथा, परंपरांवर परिणाम
नंदुरबार : कोरोनाचे सावट व संचारबंदीमुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास बंदी असल्याने सासुरवाशीण महिलेला अक्षय तृतीयेनिमित्त गेल्या वर्षीप्रमाणेच माहेरी जाण्यास मिळणार नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे खान्देशात असलेली झोका खेळण्याची, पत्त्यांचा डाव रंगविण्याची प्रथा व परंपरेलाही कोरोनामुळे फाटा द्यावा लागणार आहे. दरम्यान, सालदारकीऐवजी रोजंदारीवर कामाला जाण्यास मजुरांचे प्राधान्य वाढल्याने सालदार मिळणेही कठीण झाले आहे.
नंदुरबार जिल्ह्यात अक्षय तृतीयेनिमित्त बाजाराच्या वेळेत खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. कोरोना असला तरी पारंपरिक प्रथा व परंपरा पाळाव्याच लागतात. गेल्या वर्षी देखील कोरोनाच्या सावटातच अक्षय तृतीया साजरी करावी लागली. यंदादेखील तीच परिस्थिती आहे. त्यामुळे सासुरवाशीण महिलेला सासरीच अक्षय तृतीया साजरी करावी लागणार आहे.
पितरांचे स्मरण करण्यासाठी खान्देशात घागर भरण्याचा कार्यक्रम असतो. त्यासाठी बाजारातून नवीन मातीची घागर घ्यावी लागते. नैवेद्य दाखवावा लागतो. हा विधी प्रत्येक घरात करावाच लागणार आहे. कोरोनामुळे बाहेर निघण्यास मज्जाव असताना कुटुंबातील सदस्य व परिसरातील महिला मिळून झोका खेळण्याच्या परंपरेवरही मर्यादा येतील असे चित्र आहे.
सालदार मिळेना...
दरम्यान, जिल्ह्यात सालदारकीची पद्धत कमी झाली आहे. रोजंदारीवर अधिक मजुरी मिळत असल्याने सहसा सालदारकीला कुणी तयार होत नाहीत. नंदुरबारातील माळीवाड्यात पूर्वी सर्वाधिक वजन उचलून शक्ती आजमविण्याची प्रथा होती. जो जास्त वजनाचा दगड उचलेल, त्याला अधिक रक्कम देऊन सालदार म्हणून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये बोली लागत होती. आता ती प्रथाही कालबाह्य झाली आहे.