कोरोनाला ९०० गावांनी वेशीवरच रोखले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 12:16 IST2020-08-14T12:16:27+5:302020-08-14T12:16:35+5:30
मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील अवघ्या चार टक्के अर्थात ४३ गावांमध्येच कोरोनाचा शिरकाव झाला आहे. ...

कोरोनाला ९०० गावांनी वेशीवरच रोखले !
मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील अवघ्या चार टक्के अर्थात ४३ गावांमध्येच कोरोनाचा शिरकाव झाला आहे. तब्बल ९०० गावांनी अद्यापही कोरोनाला आपल्या हद्दीबाहेरच थांबविले आहे. विशेषत: दुर्गम भागातील अर्थात धडगाव, अक्कलकुवा व तळोदा तालुक्यातील अनेक गावे अद्यापही नैसर्गिक क्वॉरंटाईन असल्याचेच एकंदरीत चित्र आहे. सध्या जिल्ह्यात सामुहिक संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. अशा वेळी आणखी खबरदारी घेणे या गावांना आवश्यक ठरणार आहे.
नंदुरबार जिल्ह्याची नैसर्गिक रचनाच वैशिष्टयेपुर्ण आहे. दोन तालुके संपुर्णत: सातपुड्यातील पहाडपट्टीत आहेत. तर दोन तालुक्यांमधील काही भाग त्यात समाविष्ट आहे. नैसर्गिक राहणीमान, काटक शरिरयष्टी, आहार यामुळे जिल्ह्यातील अद्यापही तब्बल ९६ टक्के गावे ही कोरोनापासून लांब आहेत. बाधीत ४३ गावांमध्येही कोरोनाचा शिरकाव हा दुसऱ्या शहरातून किंवा बाधीत भागातून आलेल्या व्यक्तींमुळेच झाला आहे. आतापर्यंत आढळलेल्या एकुण ९३८ रुग्णांमध्ये ८० टक्के रुग्ण हे शहरी भागातील आहेत. अवघे २० टक्के ग्रामिण भागातील आहेत. त्यामुळे कोरोनाच्या दृष्टीने आजही ग्रामिण भाग सुरक्षीत मानला जात आहे.
जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून ग्रामिण भागात सुरुवातीपासूनच कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घेतली गेली आहे. ग्रामरक्षक दल, युवकांचा पुढाकार, आरोग्य विभागाची सक्षम यंत्रणा आणि गावकऱ्यांची दक्षता यामुळे हे शक्य झाल्याचे चित्र आहे. धडगाव तालुक्यात तर दोन दिवसांपर्यंत अवघा एक रुग्ण आणि एकच गाव प्रभावीत होते. दोन दिवसांपूर्वी तोरणमाळ येथे रुग्ण आढळून आले. ते देखील इतर ठिकाणाहून आलेले होते. अक्कलकुवा तालुक्यातील स्थिती देखील यापेक्षा वेगळी नव्हती.
सद्य स्थितीत जिल्ह्यात रुग्ण सापडण्याचे प्रमाण हे शहरी भागात सर्वाधिक आहे. ग्रामिण भागातील मोजक्याच गावांमध्ये १० पेक्षा अधीक रुग्ण आढळून आल्याची स्थिती आहे.
लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात परराज्यातून जवळपास ४८ हजार मजूर व इतरजण जिल्ह्यात आले. विशेषत: आदिवासी भागातील गावांमध्ये हे मजूर आले. परंतु कोरोनाचा कुठलाही प्रादुर्भाव त्यांच्यापासून झाला नाही. अनेक गावांनी अशा लोकांना गावाबाहेर काही दिवस क्वॉरंटाईन केले. काहींनी झाडाखाली क्वॉरंटाईनचे दिवस काढले. त्यामुळे सुरुवातीला घेण्यात आलेली दक्षता शेवटपर्यंत ठेवण्यात अनेक गावांना यश आल्याने ग्रामिण भागात अर्थात गावांमध्ये कोरोनाचा फास्त प्रादुर्भाव झाला नाही हे स्पष्ट आहे. लॉकडाऊनच्या काळात शेतकºयांना बियाणे, खते घेण्यासाठी शहरी भागात यावे लागत होते. परंतु त्यासाठी आवश्यक त्या सर्व खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत होत्या.
यापुढील काळ हा समुह संसर्गाचा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामिण भागाने आतापर्यंत कोरोनाचा शिरकाव करू दिला नाही. आता यापुढील काळात देखील शिरकाव होणार नाही यादृष्टीने नियोजन करून उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी शासन, लोकप्रतिनिधी, स्थानिक ग्रामस्थ यांच्या सामुहिक प्रयत्नांची गरज आहे.
कोरोनामुक्त गावे
धानोरा, कोपर्ली, धडगाव, वाण्याविहीर, ठाणेपाडा, न्याहली, रायखेड, कोरीट, हाटमोहिदा, राजबर्डी, पिंपळखुटा, काठी, डाब, असली, ब्राम्हणपुरी, डामळदा, मांजरे, असलोद, कहाटूळ, रायंगण, घोटाणे, बिलमांजरे, सुलवाडा, पाचोराबारी, गणोर, धुरखेडा, शहाणा, कोरीट.
प्राथमिक आ. केंद्र-उपकेद्रांची भूमिका
कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात आरोग्य केंद्रांमध्ये उपचाराबाबत चालढकलपणा झाला. नंतर मात्र स्थानिक ठिकाणीच उपचार सुरू झाले. आरोग्य केंद्र, उपकेंद्राच्या कर्मचाºयांना कोविड उपचार कक्षांमध्ये ड्युटी दिली जात आहे. त्यामुळे ओपीडींवर काही प्रमाणात अडचणी येत आहेत.
अंगणवाडी ताई, आशा वर्कर्सचा रोल
गेल्या चार महिन्यात अंगणवाडी व आशा कर्मचारी देखील कोविड योद्धा म्हणून काम करीत आहेत. गावोगावी, घरोघरी सर्व्हेक्षण केले जात आहे. गरोदर,प्रसुती झालेल्या महिला, बालकांना वेळेवर आहार देणे यासाठी या कर्मचाºयांनी मेहनत घेतली. तोकड्या सुरक्षा उपकरणांवर त्यांनी आपले काम केले.