कोरोनामुळे टाळ, विणा, पखवादाचा निनाद थांबला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:23 IST2021-06-02T04:23:17+5:302021-06-02T04:23:17+5:30
वारकरी संप्रदायाची भगवी पताका खांद्यावर घेऊन महाशिवरात्रीपासून गावोगावी अखंड हरिनाम सप्ताहाची अनेक वर्षांची परंपरा आहे. परंतु गेल्या वर्षापासून कोरोना ...

कोरोनामुळे टाळ, विणा, पखवादाचा निनाद थांबला
वारकरी संप्रदायाची भगवी पताका खांद्यावर घेऊन महाशिवरात्रीपासून गावोगावी अखंड हरिनाम सप्ताहाची अनेक वर्षांची परंपरा आहे. परंतु गेल्या वर्षापासून कोरोना विषाणूने थैमान घातल्यामुळे तो आजार रोखण्यासाठी शासनाच्या वतीने धार्मिक कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत. एकादशीनिमित्त गावोगावी होणारे सामूहिक भजन, कीर्तन, प्रवचन तसेच दररोज सायंकाळी गावातील मंदिरांमध्ये सामूहिक हरिपाठ उपासना चालत असतात. याला टाळ, विणा, पखवादाची साथ असते. मात्र कोरोना संसर्गाच्या भीतीने लागू असलेल्या संचारबंदीमुळे हा निनाद थांबला आहे. मार्च महिन्यापासून अखंड हरिनाम सप्ताह, पदयात्रा, मेळावे, उत्सव मोठ्या प्रमाणात चालू होतात. या काळात गावोगावी अखंड हरिनाम सप्ताहांमुळे कीर्तनकार, पखवादक, विणेकरी, चोपदार, टाळकरी, प्रवचनकार या दिवसांत व्यस्त असतात. परंतु गेल्या वर्षापासून कोरोनामुळे संचारबंदी तर कधी लॉकडाऊन चालूच आहे. त्यामुळे सर्व सामूहिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम रद्द झाले आहेत. गर्दी टाळण्यासाठी कीर्तनकार, प्रवचनकार कुठेही जात नाहीत. एप्रिल-मे महिन्यात हरिनाम सप्ताहात काकडा आरती, गाथा पारायण, भजन, कीर्तन, प्रवचन तसेच गावात स्नेहभोजन आदींसह दिनक्रम चालू असतात. गावोगावी प्रत्येक एकादशीला रात्री सामूहिक भजन तर दुसऱ्या दिवशी द्वादशीला स्नेहभोजन, दररोज मंदिरांमध्ये सायंकाळी सामूहिक हरिपाठ होतो. त्यामुळे मंदिर परिसरात आनंदमय व भक्तीमय वातावरण निर्माण होते. चैत्र महिन्यात बऱ्याच ठिकाणी यात्रा भरविण्यात येतात. तसेच रामनवमीचा कार्यक्रमही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. पण, कोरोनाच्या भीतीने व संचारबंदीमुळे सर्व धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम रद्द झाले आहेत. काही ठिकाणी सप्ताहाची परंपरा स्थगित होऊ नये यासाठी तुकाराम गाथा पारायण, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण एकाच व्यक्तीने मंदिरामध्ये बसून त्याच तिथीवर सुरू असल्याचेही दिसून येत आहे.