कोरोना पावला; पहिली ते आठवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:27 IST2021-04-05T04:27:04+5:302021-04-05T04:27:04+5:30

नंदुरबार जिल्ह्यातील दोन हजार ४६ शाळेतील विद्यार्थी पुढील वर्गात जाणार लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ...

Corona Pavla; 1st to 8th | कोरोना पावला; पहिली ते आठवी

कोरोना पावला; पहिली ते आठवी

नंदुरबार जिल्ह्यातील दोन हजार ४६ शाळेतील विद्यार्थी पुढील वर्गात जाणार

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण हक्क कायद्यांतर्गत राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केल्यामुळे जिल्ह्यातील दोन लाख ५८ हजार ३९९ विद्यार्थी आता परीक्षा न देता पास होऊन पुढील वर्गात जाणार आहेत.

कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून शैक्षणिक क्षेत्रावर गदा आल्यागत स्थिती आहे. लाॅकडाऊन व संसर्ग वाढल्याने शाळा बंद होत्या. ऑनलाइन शिक्षण सुरू होते. काही ठिकाणी नवनवीन प्रयोग केले जात होते. कनेक्टिव्हिटी व स्मार्ट फोनच्या अभावाने अनेक विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासूनही वंचित राहिले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. आता परीक्षा घेण्याची वेळ आली असताना काेरोनाचा संसर्ग पुन्हा वाढल्याने शेवटी शिक्षण हक्क कायद्यांतर्गत पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पुढच्या वर्गात पास करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात पालकांमध्येदेखील संमिश्र प्रतिक्रिया आहेत.

जिल्ह्यात पहिली ते आठवीच्या एकूण २०४६ शाळा आहेत. त्यात एक हजार ३८९ जिल्हा परिषदेच्या शाळांचा समावेश आहे. या सर्व शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंत दोन लाख ५८ हजार ३९९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केलेल्या निर्णयाचा लाभ होणार आहे. हे सर्व विद्यार्थी आता परीक्षा न देता पुढील वर्गात पास करण्यात येणार आहे.

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पहिली ते आठवी पास करण्याचा निर्णय घेण्यात आला. मार्चपासून कोरोनाने थैमान घातले आहे. या दरम्यान शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी शाळा बंद; परंतु शिक्षण सुरू, असा उपक्रम सुरू असून, ऑनलाइन शिक्षण, स्वाध्याय उपक्रम, विविध कार्यक्रम ऑनलाइनच्या माध्यमातून घेतले. तसेच स्वयंअध्ययनामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची सवय लागली. परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे मोबाइल, आर्थिक परिस्थिती, नेटवर्क अडचणमुळे वरील ऑनलाइन शिक्षण घेता आले नाही, असे विद्यार्थी अशा शिक्षणापासून वंचित राहिले. पुढील शैक्षणिक वर्षात मागील इयत्तेचे शैक्षणिक उद्दिष्टे अभ्यासक्रमात काहीअंशी घेतले तर हा निर्णय योग्य ठरेल.

- नीलेश गावीत, पालक, नंदुरबार

आपण बघतच आहोत, गेल्या एक वर्षात संपूर्ण जगभरात कोविडच्या प्रादुर्भावाने खळबळ माजवली आहे. यामुळे विविध क्षेत्रांचे कमी-जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यासोबतच शिक्षणक्षेत्राचेदेखील नुकसान झाले. विद्यार्थ्यांचेदेखील ऑनलाइन शिक्षणामुळे हाल होत आहेत. शाळा बंद आहेत, बऱ्याच विद्यार्थ्यांकडे मोबाइल नसल्यामुळे ऑनलाइन शिक्षणाला ते मुकत आहेत. तसेच उत्तम सुविधा उपलब्ध नसल्यामुळे ऑनलाइन शिक्षणातदेखील व्यत्यय येत आहे. मध्ये लॉकडाऊन संपल्यावर शाळा सुरू झाल्यात; पण कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढल्याने शाळा बंद कराव्या लागल्या. यावर्षीदेखील शाळा लवकर सुरू होण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. यात मुलांचे विनाकारण नुकसान होत आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर उपाययोजना करायला हव्यात.

- सविता शिंदे, शहादा

आज सर्वत्र परिस्थिती खूपच अवघड झाली आहे. संपूर्ण कुटुंबाला आजाराचा विळखा बसतोय. कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेचा फटका तरुणवर्ग तसेच लहान बालकांनाही बसतोय. शिक्षकांचाही बळी जातोय. लहान मुलांमध्येही आता पोटदुखी, संडास, ताप या प्रकारात कोरोनाचा शिरकाव झालाय. शेवटी येणाऱ्या पिढीची काळजी घ्यावीच लागेल. मुलांना काही होत जरी नसेल तरी बालक कोरोना आजाराचे मोठे वाहक आहेत. शेवटी जीव महत्त्वाचा. त्यामुळे शासनाने इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढच्या वर्गात पाठवण्याचा निर्णय योग्य आहे.

-एन.डी. पाटील, शहादा

शासनाने घेतलेला निर्णय हा परिस्थितीला अनुकूल आहे. मुलांना कसे आपण परीक्षेला पाठवू हेही विचार करण्याची गोष्ट आहे. यातून एकच आहे की, विद्यार्थी हा आळशी होईल. त्याला परिणामाचे गांभीर्य राहाणार नाही. परंतु सातवी व आठवीच्या विद्यार्थ्याल पुढील अभ्यास हा अवघड जाणार आहे. कारण की त्याची अभ्यास करण्याची मानसिकता खालावणार आहे. त्यामुळे त्याच्या गुणवत्तेवर होईल.

- अनिल रौंदळ, पालक

कोरोनामुळे शाळा व क्लासेस बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर मोठा परिणाम झाला आहे. या कालावधीत शिक्षकांनी मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. ऑनलाइनमुळे विद्यार्थ्यांना किती ज्ञान मिळाले हा प्रश्न अनुत्तरित आहे. गेल्या वर्षभर अभ्यास करून शेवटी परीक्षा झाल्या नाही. आरोग्याच्या दृष्टीने सूचक पाऊल असले तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.

- सेजल अजित पाटील, शहादा

Web Title: Corona Pavla; 1st to 8th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.