कोरोनामुळे थंडावला टाळ, वीणा, पखवाजाचा निनाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:21 IST2021-07-01T04:21:53+5:302021-07-01T04:21:53+5:30
वारकरी संप्रदायाची भगवी पताका खांद्यावर घेऊन महाशिवरात्रीपासून अनेक गावोगावी अखंड हरिनाम सप्ताहाची अनेक वर्षांची परंपरा आहे. परंतु, गतवर्षापासून कोरोना ...

कोरोनामुळे थंडावला टाळ, वीणा, पखवाजाचा निनाद
वारकरी संप्रदायाची भगवी पताका खांद्यावर घेऊन महाशिवरात्रीपासून अनेक गावोगावी अखंड हरिनाम सप्ताहाची अनेक वर्षांची परंपरा आहे. परंतु, गतवर्षापासून कोरोना आजाराने थैमान घातल्यामुळे तो आजार रोखण्यासाठी शासनाच्या वतीने धार्मिक कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत. एकादशीनिमित्त चालणारे गावोगावी सामूहिक भजन, कीर्तन, प्रवचन तसेच दररोज सायंकाळी गावातील मंदिरांमध्ये सामूहिक हरिपाठ, उपासना चालत असतात. याला टाळ, वीणा, पखवाजाची साथ असते. मात्र, कोरोना संसर्गाच्या भीतीने लागू असलेल्या संचारबंदीमुळे हा निनाद थांबला आहे.
मार्च महिन्यापासून अखंड हरिनाम सप्ताह, यात्रा, मेळावे, उत्सव, मोठ्या प्रमाणात चालू होतात. या काळात अनेक गावोगावी अखंड हरिनाम सप्ताहाची संख्या मोठ्या प्रमाणात असते. कीर्तनकार, पखवाजवादक, विणेकरी, चोपदार, टाळकरी, प्रवचनकारही या दिवसांत व्यस्त असतात. परंतु, गतवर्षीपासून कोरोनामुळे संचारबंदी तर कधी लॉकडाऊन चालूच आहे. यामुळे सर्व सामूहिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम रद्द झाले आहेत. लोकांची गर्दी टाळण्यासाठी कीर्तनकार, प्रवचनकार कुठेही जात नाहीत. आषाढ, श्रावण महिन्यांत गावोगावी श्रीमद्भागवत सप्ताह, काकडा आरती, गाथा पारायण, भजन, कीर्तन, प्रवचन तसेच गावात स्नेहभोजन आदींसह दिनक्रम चालू असतात. गावोगावी प्रत्येक एकादशीला रात्री संप्रदाय पंथाचे सामूहिक भजन, तर दुसऱ्या दिवशी द्वादशीला स्नेहभोजन, दररोज मंदिरामध्ये सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान सामूहिक हरिपाठ होत असतो.
मंदिर परिसरात आनंदमय व भक्तिमय वातावरण निर्माण होते. पण, कोरोनाच्या भीतीने व चालू असलेल्या संचारबंदीमुळे सर्व धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम रद्द झाले आहेत. काही ठिकाणी सप्ताहाची परंपरा स्थगित होऊ नये, यासाठी तुकाराम गाथा पारायण, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण एकाच व्यक्तीने मंदिरामध्ये बसून, त्याच तिथीवर सुरू असल्याचे दिसून येत आहे.