जिल्ह्यात ‘कोरोना को हराना’ हळूहळू दृष्टिपथात...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:33 IST2021-04-23T04:33:00+5:302021-04-23T04:33:00+5:30
मनोेज शेलार मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत कोरोनाने जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. आता कुठे कोरोनाचा ग्राफ ...

जिल्ह्यात ‘कोरोना को हराना’ हळूहळू दृष्टिपथात...
मनोेज शेलार
मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत कोरोनाने जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. आता कुठे कोरोनाचा ग्राफ खाली येऊ लागला आहे. त्याला कारण जिल्हास्तरीय विविध उपाययोजना आणि लोकांमधील संयम आणि नियमांचे पालन. सद्या जिल्हा ऑक्सिजन पुरवठ्याबाबत समाधानकारक स्थिती आहे. ऑक्सिजन बेडची संख्या वाढली आहे. व्हेंटिलेटरदेखील पुरेशा प्रमाणात आहेत. कोविड केअर सेंटर तालुकास्तरावर वाढले आहेत. शिवाय मोठ्या गावांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन झाले आहेत. आणखी काही दिवस लोकांनी संयम ठेवला तर कोरोनाला हरविण्यात जिल्ह्याला यश येईल, अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.
जिल्ह्यात मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली होती. कोरोनाची दुसरी लाट एवढ्या वेगाने फैलली की प्रशासनाला उपाययोजना करताना नाकी नऊ आले होते. रुग्णांना दवाखान्यात बेड मिळत नव्हते. ऑक्सिजन बेडसाठी तर विनवण्या केल्या जात होत्या. व्हेंटिलेटरचा तर लांबचा प्रश्न होता. त्यामुळे जिल्ह्यातून सुरत, धुळे व नाशिक येेथे दररोज ८० ते १०० रुग्ण उपचारासाठी जात होते. रुग्णवाहिका मिळत नव्हत्या तर खासगी वाहनाने रुग्ण रवाना होत होते. त्यासाठी संबंधित रुग्णालयांमध्ये आधी बेड बुकिंग करावा लागत होता. शिवाय अग्रीम रक्कमदेखील जमा करावी लागत होती. कोरोनाचा हाहाकार असतांना रेमडेसिविरनेही रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना हैराण करून सोडले होते. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी कडक नियम घालून देत त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर सुविधा उपलब्ध करण्यास देखील त्यांनी प्राधान्य दिले. त्याचा परिणाम म्हणून गेल्या आठ दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येचा ग्राफ कमालीचा खालावला आहे. अशीच स्थिती राहिल्यास मे महिन्यात जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती फेब्रुवारी महिन्यात जशी होती तशी होऊ शकेल, अशी आशा करण्यास हरकत नाही.
जिल्ह्यात उपलब्ध आरोग्य सुविधांचा विचार करता जिल्ह्यात दोन ऑक्सिजन प्लॅन्ट कार्यान्वित आहेत. लवकरच जम्बो प्लॅन्ट कार्यान्वित होणार आहे. शहादा येथे मिनी प्लॅन्ट तयार होत आहे. तळोदा येथेही प्रक्रिया सुरू आहे. दवाखान्यांची संख्यादेखील वाढली आहे. चार सरकारी दवाखान्यांमध्ये व १९खासगी दवाखान्यांमध्ये उपचाराची सुविधा आहे. तेथे एकूण एक हजार २९२ बेड आहेत. ११ कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले असून त्या ठिकाणी एक हजार ३५५बेड आहेत. ऑक्सिजन बेडचा विचार करता शासकीय रुग्णालयांमध्ये २७८ तर खासगी रुग्णालयांमध्ये ३५९ बेड आहेत. व्हेंटिलेटर बेडची संख्यादेखील वाढली असून शासकीय रुग्णालयांमध्ये ६० तर खासगी रुग्णालयांमध्ये १०० बेड आहेत. गेल्या चार ते पाच महिन्यात जिल्ह्याला नवीन ३० रुग्णवाहिका मिळालेल्या आहेत. इतर सरकारी कर्मचाऱ्यांची सेवादेखील कोविडसाठी अधिग्रहीत करण्यात आली आहे. त्यामुळे आरोग्य सुविधा वाढण्यास मदत होऊन कोरोनाचा ग्राफ कमी झाला आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार १५ मार्च ते २१ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात २० हजार ६५८ नवीन रुग्ण आढळून आले तर २७९ जणांचा मृत्यू झाला. याशिवाय १२ हजार ५१६ जण या काळात कोरोनातून बरे झाले आहेत. सद्या ३०० च्या आतच रुग़्ण आढळून येत आहेत. आता लॅाकडाऊनची आणखी कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होणार आहे. परिणामी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे. जिल्हावासीयांनी आणखी दहा ते १५ दिवस संयम बाळगल्यास, प्रशासनाला सहकार्य केल्यास मे महिन्यात कोरोनाला आपण हरवू शकू, अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.