३३ दिवसांनंतर प्रकाशा गावात कोरोनाचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:23 IST2021-05-29T04:23:44+5:302021-05-29T04:23:44+5:30
सुमारे १८ हजार लोकवस्तीच्या प्रकाशा गावात २५ एप्रिल ते २७ मे या कालावधीत एकही कोरोना रुग्ण आढळून ...

३३ दिवसांनंतर प्रकाशा गावात कोरोनाचा शिरकाव
सुमारे १८ हजार लोकवस्तीच्या प्रकाशा गावात २५ एप्रिल ते २७ मे या कालावधीत एकही कोरोना रुग्ण आढळून न आल्याने गाव कोरोनामुक्त झाले होते. साहजिकच यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र २६ मे रोजी एक १७ वर्षीय तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गावात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या तरुणावर मोहिदे येथील कोरोना सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली असता तरुणाचे आई व वडील यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावरही कोरोना सेंटरमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी बी.जी. पाटील यांनी दिली.
दरम्यान, गावात कोरोना शिरकाव झाला असला तरी रुग्ण संख्या वाढू नये म्हणून ग्रामपंचायत, महसूल व पोलीस विभाग यांनी कंबर कसली असून शुक्रवारी ग्रामपंचायतीने प्रकाशा येथील सर्व व्यापाऱ्यांसाठी एक परिपत्रक काढून कोरोना चाचणीची सक्ती केली आहे.
प्रकाशा येथे मोठी बाजारपेठ असून परिसरातील सुमारे १५ गावांतील नागरिक बाजारासाठी प्रकाशा येथे येतात. त्यांचा दुकानदारांशी संपर्क असतो म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये व्यापाऱ्यांनी आरटीपीसीआर चाचणी करून घेणे बंधनकारक आहे. म्हणून प्रकाशा येथील व्यापारी व बाहेरगावाहून येणारे सर्व व्यापारी, किराणा दुकानदार, भाजीपाला, फळ विक्रेते, जनरल स्टोअर्स, मेडिकल, कापड दुकानदार, पान दुकानदार, सर्व फेरीवाले, इलेक्ट्रीक दुकानदार, चप्पल- बूट, मासे, मटन, हार्डवेअर, कृषी सेवा केंद्र, पीठ गिरणी, गॅरेज, फुटाणे-लाह्या विक्रेते यांच्यासह दुकानावर काम करणाऱ्या कामगारांनी ३१ मे रोजी ग्रामपंचायत कार्यालय प्रकाशा येथे सकाळी १० वाजेपासून होणाऱ्या कोरोना चाचणी शिबिरात तपासणी करून घेणे बंधनकारक आहे. कोरोना चाचणीनंतर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ज्या व्यापाऱ्यांकडे प्रमाणपत्र असेल त्यांनाच दुकान उघडण्यास परवानगी मिळेल, असे परिपत्रक प्रकाशा ग्रामपंचायतीने काढले आहे. तसेच व्यावसायिकांनी कोरोना नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याने ग्रामपंचायतीकडून कळविण्यात आले आहे.