कोरोना-एक सकारात्मक धडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:19 IST2021-07-12T04:19:33+5:302021-07-12T04:19:33+5:30

मानव हा समाजशील प्राणी आहे, असे म्हणतात. मात्र त्याच मानवावर एकांत व एकटे राहण्याची वेळ घरातल्या घरात आली. ...

Corona एक a positive lesson | कोरोना-एक सकारात्मक धडा

कोरोना-एक सकारात्मक धडा

मानव हा समाजशील प्राणी आहे, असे म्हणतात. मात्र त्याच मानवावर एकांत व एकटे राहण्याची वेळ घरातल्या घरात आली. तो काळ मोठा कठीण होता. प्रत्येक देश, राज्य, जिल्हा, तालुका, शहर, गाव, खेडी, वस्ती आपापले क्षेत्र सुरक्षित व ग्रीन झोनमध्ये रहावे यासाठी आपापल्या कुटुंबापासूनच निश्चित स्वरूपात काळजी घेत होते. त्यावेळी हे ‘विश्वची माझे घर’ याचा नक्कीच प्रत्येकाला परिचय झाला. ज्यांचे जीव गेले त्यांच्या प्रती मनात नेहमी दुःख आहेच. कारण डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांना यश मिळू शकले नाही. रात्रंदिवस उभे असलेल्या असंख्य सैनिकांमध्ये डॉक्टर, पोलीस, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार, रुग्णवाहिका चालक, आशा सेविका, महिला पोलीस, पत्रकार बंधू-भगिनी अनेक सरकारी कार्यालयातील कर्मचारी या सर्वांवर नियंत्रण व लक्ष केंद्रित करणारा सर्वांत मोठा घटक म्हणजे जिल्हाधिकारी, स्थानिक पोलीस प्रशासन, सामाजिक व सार्वजनिक संस्था, शिक्षक या सर्व क्षेत्रांतील व्यक्तींनी आपापली जबाबदारी पार पाडली व निभावली. मानवाच्या प्रत्येक वस्तीपर्यंत विळखा घातलेल्या कोरोनाने भयभीत झालेले जग हाताशी काम नाही, खाणार काय कुणाला नुकतीच नोकरी लागली होती, कुणी नुकताच धंदा उभारला होता, भावी पती मोठ्या शहरात नोकरी करतो म्हणून स्वप्न रंगवत लग्न केले होते, अशा कितीतरी नववधू तर स्थलांतर करून परराज्यांत, परदेशात स्थिर होण्यासाठी गेलेले अनेक कुटुंब मात्र काही क्षणातच होत्याचे नव्हते झाले. अन् प्रचंड मोठ्या प्रमाणात भूकंप व्हावा व पृथ्वीचा नाश व्हावा उलथापालथ व्हावी काहीही न उरावे तशा विळख्यात मानव सापडला खरा, पण या निराशावस्थेत, वैफल्यग्रस्ततेत मानव डगमगला नाही.

जसे- कशास आई भिजविसी डोळे

उजळ तुझे भाळ

रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उषःकाल

या वरील काव्यपंक्तीप्रमाणे पोहता न येणारा पाण्यात पडला अन् जीव वाचवण्यासाठी हात-पाय हलवू लागला. तसेच काहीसे घडत गेले. निराशा सोडून मानव आत्मनिर्भर होऊ लागला व नववाटा शोधू लागला. घरी बसल्या-बसल्या काही करता येते का? याचा विचार व कल्पनेला वाव देऊ लागला. मी, माझे कुटुंबच नव्हे तर परिसर, समाज सर्व काही पूर्ववत होण्यास भर घालू लागले. जगायचे कसे? याचे बिज रोवू लागला. परिस्थिती घडून गेली आहे त्याला दोष देण्यात अर्थ नाही म्हणून उपाय शोधून तग धरून उभे राहण्यासाठी केवळ पुरुषच नव्हे तर घरातील आबालवृद्धांना चांगल्या सवयी व वळण लागले. हाताशी काम हवे, ‘ये रे हरी देई खाटल्यावरी’ हा ‘आलस्य भाव’ नष्ट होऊ लागला. घराघरांत कामवाली बाई, मोलकरीण येणे बंद झाले. कुणी कितीही श्रीमंत व साहेबी थाटाचे जगत असेल मात्र प्रत्येकाला घरकाम करावेच लागले. त्यावेळी आपल्यापेक्षा खालच्या दर्जाचे काम करणाऱ्याची किंमत व महत्त्व कळू लागले. कोरोना आला खूप काही हिरावून नेले. मात्र खूप काही शिकवूनही गेला. स्वच्छता, आरोग्य, आहार व्यायाम आप-परभाव, जाणीव-जागृती काटकसर, आपुलकी, नातेसंबंध, सहकार्य इत्यादी असंख्य नीतिमूल्यांची पेरणी जणू याच काळात मोठ्या प्रमाणात झाली.

माणसाचे कोरोना नंतरचे जगणे पूर्णतः बदलले. उदाहरणार्थ प्राचीन काळात एकत्र कुटुंब पद्धतीने मानव जीवन जगत होता कोरोनामुळे व्यवहार बंद असल्याने सर्वांना आपापल्या गावाकडे घराकडे स्थलांतर करावे लागले आणि त्यामुळे दुरावलेली व उसवलेली नाती, कुटुंबातील व्यक्ती जवळ आलीत. एक दुसऱ्याची काळजी करायला लागली. एकमेकांप्रती आदरभाव, आपुलकी निर्माण झाली जग कडीबंदी झाले. मात्र मनामनाची दरवाजे आपोआप उघडलीत, अहंकार विसरला कारण हे मातीचे देह मातीतच मिसळणार गर्व अहंकार, ‘मी’पणा झिडकारून स्नेहाने जगायला शिकला.

घरी असणाऱ्या स्त्री वर्गासाठी कडीबंदी हा विषय फारसा नवीन नसावा कारण प्राचीन काळात ‘रांधा, वाढा, उष्टी काढा’ या अवस्थेतच स्त्री जीवन जगत होती. ‘उंबरठ्याच्या आत अन् सातच्या आत घरात’ असे स्त्रीला पूर्वापार बंधन होते. तसेच आजही ग्रामीण भागात स्त्रियांना थोडेफार स्वातंत्र्य मिळाले असले तरीही काही प्रमाणात विचार करता स्त्रिया घरातच असतात. यातून स्त्री जीवनाचा अभ्यास करता आला. कारण स्त्रियांनी घरात राहून संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सर्वोत्तमरीत्या निभावली आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ याचे पालन खऱ्या अर्थाने स्त्री वर्गाने अधिक प्रमाणात निभावली. कोरोनापासून बचाव व्हावा कुटुंब सुरक्षित राहावे म्हणून वैद्यकीय उपचार, घरातल्या घरात अनेक प्रकारचे काढे उकळणे, आबालवृद्धांना नवनवीन पदार्थ बनवून खायला देणे यात ती नेहमी व्यस्त, पण मस्त जीवन जगत होती.

आरोग्य ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. त्यामुळे आरोग्य, आहार, व्यायाम यासाठी चांगले चांगले प्रयत्न केले जाऊ लागले. जग हे कोरोनामय झाले त्यामुळे समाजासमोर, नेत्यांसमोर प्रश्न पडू लागला अर्थव्यवस्थेची कसे होणार? जे-ते प्रशासन आपले क्षेत्र सुरक्षित ठेवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत माझ्या नंदनगरीतही आरोग्य सुविधेत भर झाली. एम.आर.आय, सी.टी .स्कॅन सेंटर वाढले, ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करण्यात आली. ज्या ऑक्सिजन प्रकल्प निर्मितीची अनुकरण इतर जिल्ह्यांतच नव्हे तर राज्यात, देशातदेखील नंदुरबार पॅटर्न राबविले गेले व याची चर्चा व नोंद सर्वदूर झाली हे विशेष. तसेच नंदुरबार आदिवासी जिल्हा असूनही मल्टी-स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारण्यात आले. प्रत्येक क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर सेवेत हजर झालेत. कोरोना चाचणी व निदानासाठी नवनवीन प्रयोग नंदुरबारमध्ये होऊ लागले. मनुष्यबळ वाढले, जो-तो आपापल्या जबाबदारीने कार्यतत्पर व सज्ज राहिला. पैसा किती महत्त्वाचा आहे त्यामुळे माणूस काटकसर करू लागला. लग्नसराई कमी लोकांत व कमी खर्चात होऊ लागली. आर्थिक बजेट करण्याचे कसब घरातील प्रत्येक व्यक्तीला शिकता आले. सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे शिक्षणात झाला ऑनलाइन क्लासेसद्वारा शिक्षण घरोघरी पोहोचले. तसेच केवळ पदवीचे शिक्षणच उपयुक्त नसून आपल्यामधील कौशल्य विकासावरदेखील भर दिला जाऊ लागला. अनेकांनी घरी बसल्या वर्क फ्रॉम होम केले व त्यातच नवनिर्मितीस चालना दिल्याने आपल्यातील सुप्त गुण जागृत केले, साहित्य लेखन, वाचनाकडेही माणूस वळू लागला, वेळ भरून काढण्यासाठी सकारात्मकतेक क्रिया करू लागला. त्यातच कमी शिकलेल्या स्त्रियांनीदेखील मीठ, मिरची पुरवण्यासाठी घरी बसल्या कलागुणांना वाव दिला.

‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळवीती’ या तुकोबांच्या पर्यावरण रक्षणाचा संदेश प्रत्येकाला आठवल्याशिवाय राहिला नसेल कारण ऑक्सिजन मानवासाठी किती महत्त्वाचे आहे याचे महत्त्व पटले. त्यामुळे अन्न, वस्त्र, निवारा याच केवळ मानवाच्या मूलभूत गरजा नाहीत तर त्याचबरोबर ऑक्सिजन, आरोग्य या सुद्धा महत्वाच्या व आवश्यक गरजा आहेत. याकडे मानवाचा कल बदलला आणि त्यामुळे ‘वृक्ष लावा वृक्ष जगवा’ मोहिमेला चालना मिळाली. रक्तदान सर्वश्रेष्ठ दान याचेदेखील महत्त्व पटले. म्हणूनच वृत्तपत्राच्या माध्यमातून रक्तदान संदर्भात जाणीव जागृती झाली. नुकतेच लोकमत या वृत्तपत्राच्या माध्यमातून रक्तदान संदर्भात यशस्वीवजाणीव जागृती मोहीम पार पडली. सर्वधर्मसमभावानेतून रक्ताची नाती ही रक्ताची नसली तरी ती रक्ताची कशी होतील यासाठी माणूस सकारात्मक झाला.

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे

जगीचे हीन अति पतित

जगी जे दिन पद-दलित तया जाऊन उठवावे

जगाला प्रेम अर्पावे

साने गुरुजींच्या वरील प्रार्थनेचा खरा प्रत्यय मानवास आला व कोरोना महामारीने माणसापासून अंतर राखायला शिकवले खरे मात्र माणसाने माणसाशी माणसासम वागण्याची कला जपायला माणूस शिकला. म्हणूनच संकटकाळात जाती, धर्म भेदभाव विसरून कोणालाही कोणीही खांदे दिलेत. मघाशी म्हटल्याप्रमाणे वाईट काळ येतो खूप काही शिकवून जाण्यासाठीच हेच खरे.

- डॉ. सविता पटेल, नंदुरबार

Web Title: Corona एक a positive lesson

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.