कोरोनामुळे ट्रॅव्हल्सचे चाकही पंक्चर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:27 IST2021-03-22T04:27:35+5:302021-03-22T04:27:35+5:30
नंदुरबार : जिल्ह्यातून मोठ्या संख्येने बाहेरगावी स्थायिक झालेले नागरिक सण-उत्सवाच्या काळात, तसेच लग्नसराईत मूळ गावी परत येतात. यासाठी प्रामुख्याने ...

कोरोनामुळे ट्रॅव्हल्सचे चाकही पंक्चर
नंदुरबार : जिल्ह्यातून मोठ्या संख्येने बाहेरगावी स्थायिक झालेले नागरिक सण-उत्सवाच्या काळात, तसेच लग्नसराईत मूळ गावी परत येतात. यासाठी प्रामुख्याने खासगी प्रवासी बसेस अर्थात ट्रॅव्हल्सचा मोठा वापर होतो, परंतु कोरोनामुळे नागरिकांचा प्रवास कमी झाला असल्याने जिल्ह्यातून धावणाऱ्या खासगी बसेस चालक-मालक व बुकिंग घेणाऱ्यांचे व्यवसाय धोक्यात आले आहेत.
नंदुरबार शहर ते पुणे, मुंबई, अहमदाबाद व सूरत या मार्गावर साधारण ४५ बसेस कोरोनापूर्वी चालविण्यात येत होत्या. आलिशान व्यवस्थेमुळे सामान्य प्रवासीही दोन पैसे खर्च करून यातून प्रवास करत होते, परंतु काेरोनामुळे हा प्रवास तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ थांबला होता. नोव्हेंबर, २०२० पासून काही अंशी प्रवाशांची संख्या वाढत होती. यातून आलबेल सुरू असतानाच, गेल्या १५ दिवसांत कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने, ट्रॅव्हल्समधील प्रवाशांची संख्या ही निम्म्यावर आली आहे. परिणामी, जिल्ह्यातून धावणाऱ्या बसेसची संख्या ही निम्म्यावर आली असल्याची माहिती नंदुरबार शहरात ट्रॅव्हल्स बुकिंग घेणाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
गाडी रुळावर आल्यानंतर पुन्हा समस्या...
दिवाळीपूर्वी आणि दिवाळीनंतर पुणे व मुंबई येथून शहरात येणाऱ्या व येथून पुन्हा जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची संख्या वाढली होती. प्रवाशांचे बुकिंग मिळू लागल्याने व्यावसायिकांचे मागील नुकसान भरून येण्यास सुरुवात होत होती. यात डिसेंबरपासून लग्नसराई सुरू झाल्याने व्यवसायामध्ये तेजी होती, परंतू जानेवारीपासून पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ सुरू झाली. यातून फेब्रुवारी मध्यापासून या व्यावसायिकांचे हाल सुरू आहेत. १ मार्चनंतर पुणे व मुंबई येथून येणाऱ्या काही गाड्या प्रवाशांअभावी रद्द करण्यात आल्याची माहिती चालकांकडून देण्यात आली आहे.
चालक आणि वाहकांसह बुकिंग घेणारे अडचणीत
नंदुरबार शहरातून पुण्या-मुंबईकडे जाणाऱ्या सर्व ट्रॅव्हल्स या धुळे किंवा नाशिक येथील टूर्स कंपन्यांच्या आहेत. या ट्रॅव्हल्स चालक व मालकांकडून नंदुरबारात काहींना ऑनलाइन बुकिंग घेण्याचे अधिकार दिले आहेत. यातून कमिशन बेसिसवर काही होतकरू युवक दिवसभरात प्रवाशांच्या नोंदण्या करून सेवा देतात. या ट्रॅव्हल्सवरच शहरातील काही जण चालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडून या ट्रॅव्हल्सवर सेवा दिली जाते, परंतु गेल्या काही दिवसांपासून प्रवासी संख्या कमी झाल्याने बुकिंग घेणारे व चालक यांच्या रोजगारावर परिणाम होत आहे. दर दिवशी १० टक्के प्रवासी संख्या घटत असल्याचे सांगण्यात आले आहे. शासनाकडून देण्यात आलेल्या सूचनेनुसार हे चालक आणि बुकिंग घेणारे बसेसमध्ये सर्व सोयी करून देत आहेत. यात प्रामुख्याने मास्कवाटप, सॅनिटायझर व हात धुण्यासाठी पाणी व साबणही देण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
होळीसाठी दरवर्षी पुणे येथून मोठ्या संख्येने नोकरदार येतात. सोबत मुंबई परिरसरातून अनेक जण येतात. परंतु होळी साधेपणाने साजरी होत असल्याने हे नागरिक येण्याची शक्यता मावळली आहे. दुसरीकडे लग्नसराईवर निर्बंध आहेत. त्यामुळे बाहेरगावी लग्नाला येणारे प्रवासी कमी आहेत. कोरोना वाढतोय, यामुळे अनेक जण कोणत्याही वाहनातून प्रवास करणे टाळत आहेत.
- तुकाराम चित्ते, ट्रॅव्हल्स चालक, नंदुरबार