कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेले मालदा हे आदिवासी गाव झाले कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:31 IST2021-05-12T04:31:16+5:302021-05-12T04:31:16+5:30
सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले तळोदा तालुक्यातील मालदा हे १०० टक्के आदिवासी वस्ती असलेलं गाव. या गावाने खबरदारी व स्वयंशिस्त पाळून ...

कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेले मालदा हे आदिवासी गाव झाले कोरोनामुक्त
सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले तळोदा तालुक्यातील मालदा हे १०० टक्के आदिवासी वस्ती असलेलं गाव. या गावाने खबरदारी व स्वयंशिस्त पाळून कोरोनाच्या पहिल्या लाटेला वेशीवरच टांगले होते. परंतु दुसऱ्या लाटेत काही रहिवाशांना थंडी, ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवू लागल्यानंतर गावातील युवकांनी पुढाकार घेऊन घरोघरी जाऊन नागरिकांची कोरोना चाचणी करून घेतली. म्हणजे २० दिवसांपूर्वी गावात तब्बल १०८ कोरोना बाधित आढळून आले होते. साहजिकच गावकऱ्यांमध्ये प्रचंड भीती पसरली होती. हे गाव कोरोनाचे अक्षरशः हॉटस्पॉट ठरले होते. ग्रामपंचायत पदाधिकारी, आरोग्य विभाग, पंचायत समिती आणि महसूल प्रशासनाने आपसात समन्वय साधून उपाययोजनांबाबत सुयोग्य नियोजन करून या महामारीवर नियंत्रण मिळवत मात केली आहे. पंचायत समितीने बाधित रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष स्थापन करून आरोग्य पथकाने उपचार केलेत. विशेष म्हणजे एकही रुग्ण गंभीर झाला नाही. आरोग्यपथक तबल १५ दिवस तेथेच तळ ठोकून होते. रोज नियमितपणे रहिवाशांची आरोग्य तपासणी केली जात होती. गावकऱ्यांनीदेखील स्वयंशिस्त पाळत जनजागृती केली होती. ग्रामपंचायतीने तीन ते चार वेळा गावात औषध फवारणी केली होती. प्रत्येक घरोघरी रहिवाशांना मास्क, सॅनिटायझर वाटप केले होते. शिवाय शासनाच्या कोविड नियमांचे काटेकोर पालन केले तसेच माध्यमिक व जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी कोरोनाची भीती कमी करून कोरोना प्रतिबंधात्मक लसीबाबत जनजागृती केली. या सर्व उपाययोजनांमुळे गावाने कमी कालावधीत कोरोनावर मात केली आहे. सध्या गावात एकही रुग्ण नाही. त्यामुळे गाव कोरोनामुक्त झाले आहे.
आरोग्यपथक होते तळ ठोकून
सुरुवातीला गावातील काही जणांना कोरोनाची लक्षणे आढळून आल्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण यांनी गावातील काही प्रतिष्ठित लोकांना हाताशी धरून त्यांच्या आदिवासी बोली भाषेत गावकऱ्यांशी संवाद साधला. साहजिकच त्यांच्यामधील भीती दूर झाली. नागरिकांनी स्वतःहून शिबिरात येऊन आपली कोरोना चाचणी करून घेतली होती. जे बाधित होते ते विलगीकरण कक्षात यायला तयार नव्हते. त्यांची भीती दूर करून त्यांचावर स्वतंत्र आरोग्य पथकामार्फत उपचार केले. त्यामुळे दहा दिवसात सर्व रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्याच बरोबर संपूर्ण गावात आरोग्य पथकाने नियमित सर्व्हे करून औषध उपचार केले. त्याचा परिणाम म्हणून कोरोनावर मात करणे शक्य झाले.
लसीकरणालाही चांगला प्रतिसाद
सुरुवातीला कोरोना लसीबाबत रहिवाशांमध्ये प्रचंड भीती होती. ही भीती दूर करण्यासाठी गावातील युवक व जिल्हा परिषद प्राथमिक, माध्यमिक शाळा शिक्षकांना प्रबोधन केले. साहजिकच लस घेण्यासाठी लोक पुढे येऊ लागले. बुधवारी आरोग्य विभागाने शिबिर आयोजित केले होते. नागरिकांनी लसीकरण केंद्रावर उत्साहाने जाऊन लस टोचून घेतली. त्यामुळे लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, आमदार राजेश पाडवी यांनी स्वतः मालदा गावात जाऊन लसीकरण केंद्राला भेट दिली. त्यावेळी त्यांनी लसीबाबत गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. लस पूर्णपणे सुरक्षित असून, तिचा कुठलाही साइड इफेक्ट्स नाही. त्यामुळे नागरिकांनी लस टोचून घ्यावी, असे आवाहन केले. दरम्यान, ज्या लोकांनी लस घेतली त्यांना त्यांचाकडून साखर, तांदुळाचे किट वाटप करण्यात आले.