आजच्या देशव्यापी आंदोलनाला काॅंग्रेसचा पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:29 IST2021-03-26T04:29:57+5:302021-03-26T04:29:57+5:30
याबाबत दिलेल्या निवेदनात काॅंग्रेसतर्फे म्हटले आहे की, केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या विरोधात तीन काळे कायदे केलेले आहेत आणि कामगारांच्या ...

आजच्या देशव्यापी आंदोलनाला काॅंग्रेसचा पाठिंबा
याबाबत दिलेल्या निवेदनात काॅंग्रेसतर्फे म्हटले आहे की, केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या विरोधात तीन काळे कायदे केलेले आहेत आणि कामगारांच्या विरोधामध्ये एक कायदा केलेला आहे. तसेच सध्या देशामध्ये पेट्रोलचा शंभर रुपये आणि डिझेल ८८ रुपये प्रति लीटरप्रमाणे विकले जात आहे. इतकी प्रचंड दरवाढ झाल्यामुळे सर्वच वस्तूंचे भाव वाढले आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला आता जवळजवळ १०० दिवसांपेक्षा अधिक दिवस झालेले असताना केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारने या आंदोलकांकडे दुर्लक्ष केलेले आहे. देशामध्ये लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. कामगार कायद्यांमध्ये बदलामुळे आणि त्यामधील जाचक तरतुदींमुळे देशातील कामगार देशोधडीला लागणार आहे. कृषी कायद्यातील तरतुदींमुळे सर्वसामान्यांना मिळणारे रेशन बंद होणार आहे.
केंद्र सरकारने केलेल्या कायद्यांच्या विरोधात देशामधील शेतकरी संघटनांनी बंदचे भारत बंदचे आवाहन केलेले आहे. या आंदोलनाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नंदुरबार जिल्हा काँग्रेसच्या वतीने पूर्ण पाठिंबा आहे. कोरोनाच्या नावाखाली नंदुरबार जिल्हा पोलीस विभागाने काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या धरणे आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. केंद्र सरकारच्या शेतकरी आणि कामगारविरोधी तसेच सर्वसामान्यांच्या विरोधातील धोरणाचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करीत आहे. आंदोलनाला परवानगी दिली नाही म्हणून शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनाला देत असल्याचे पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक व सुभाष पाटील यांनी कळविले आहे.