तळोद्यात भाजीपाला टंचाईसह उपलब्ध भाज्यांचे दर दुपटीने वाढल्याने चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 13:03 IST2020-03-27T13:03:40+5:302020-03-27T13:03:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शहरात भाजीपाला टंचाई निर्माण झाली असून उपलब्ध भाजीपाल्याचे दर ...

तळोद्यात भाजीपाला टंचाईसह उपलब्ध भाज्यांचे दर दुपटीने वाढल्याने चिंता
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शहरात भाजीपाला टंचाई निर्माण झाली असून उपलब्ध भाजीपाल्याचे दर दुपटी आणि तिपटीने वाढल्याचे नागरिकांना अनुभवण्यास मिळत आहे़ प्रशासनाने याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे़
महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर सर्व बाजार समित्या बंद करण्यात आल्या आहेत़ तळोदा शहराला भाजीपाला पुरवठा करण्याचा एकमेव मार्ग असलेल्या मार्केट यार्डात भाजीपाला खरेदी विक्रीचे व्यवहार बंद करण्यात आल्यानंतर शहरात भाजीपाला आवक कमी झाली आहे़ यातून मिरची प्रति किलो थेट १६० रुपयांना विक्री होत आहे़ बटाटे प्रतिकिलो ४० ते ५०, कांदे ५० तर पालेभाज्यास थेट ६० रुपये प्रतिकिलो दरांमध्ये मिळू लागल्या आहेत़
विशेष म्हणजे ५ रुपयात जुडी मिळणारी कोथिंबीर आता थेट १० ते २० रुपयांपर्यत जाऊ पोहोचली आहे़ भाजीपाला ही जीवनावश्यक वस्तू असल्याने त्यांचे दर हे नियमित ठेवण्याची अपेक्षा या काळात होती़ परंतू तळोदा शहरात या नियमनाला खो दिला जात आहे़ भाजीपाला विक्री करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांना भाजीपुरवठा करणाऱ्यांकडून दर वाढ करण्यात आल्याने भाजीपाला विक्रेत्यांकडून नाईलाजाने दरवाढ करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़ हा प्रकार थांबवण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे़ तळोदा शहरात भाजीपाला पुरवठा करणारे शेतकरी नियमित दरानेच भाजीपाला पुरवठा करत असताना अचानक वाढवण्यात आलेल्या दरांचे रहस्य प्रशासनाने जाणून घेण्याची अपेक्षा आहे़ तालुक्यातील ग्रामीण भागातून साधारण २० ते २५ किलोमीटर अंतरातील गावांमधील शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी येत आणत असल्याने त्याच्या वाहतूकीसाठी खूप मोठा वाहतूक खर्च लागत नसल्याने दरवाढीची कोणतीही सबब मान्य होत नसल्याने प्रशासनाने भाजीपाला खरेदी करणारे तसेच किरकोळ विक्रेत्यांसोबत संंवाद साधून योग्य ती कार्यवाही करण्याची गरज आहे़