जिल्ह्यात १ ते १५ एप्रिलदरम्यान संपूर्ण लॉकडाऊन- जिल्हाधिकारी यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:28 IST2021-03-28T04:28:33+5:302021-03-28T04:28:33+5:30
सर्व बाजारपेठा, आठवडीबाजार, इतर अत्यावश्यक नसलेली सर्व दुकाने, शॉपिंग मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स, बार्बर शॉप, स्पा, सलून, ब्युटीपार्लर बंद राहतील. ...

जिल्ह्यात १ ते १५ एप्रिलदरम्यान संपूर्ण लॉकडाऊन- जिल्हाधिकारी यांचे आदेश
सर्व बाजारपेठा, आठवडीबाजार, इतर अत्यावश्यक नसलेली सर्व दुकाने, शॉपिंग मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स, बार्बर शॉप, स्पा, सलून, ब्युटीपार्लर बंद राहतील. करमणूक उद्याने, सिनेमागृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, प्रेक्षकगृहे, क्रीडासंकुले, मंगल कार्यालये, खुले लॉन्स, सभागृह, असेम्ब्ली हॉल बंद राहतील. सर्व हॉटेल / रेस्टॉरंट, लॉजिंग, परमिट रूम बीअर बार व इतर सर्व प्रकारच्या आस्थापना बंद राहतील.
सामाजिक, राजकीय, धार्मिक, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शने व इतर सर्व गर्दी होणारे कार्यक्रम बंद राहतील. धार्मिक व प्रार्थनास्थळे सर्वसामान्यांसाठी बंद राहतील. तथापि, धर्मगुरू, पुजारी यांना नित्यनेमाचे धार्मिक कार्यक्रम करता येतील. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून औषधाची दुकाने, रुग्णालये पूर्णवेळ सुरू राहतील. भाजीमंडई सकाळी ६ ते ११ या वेळेत सुरू राहील. मात्र, एकाआड एक ओटे राहतील. भाजीपाला आणि किराणा वस्तूंच्या घरपोच सेवेला प्राधान्य देण्यात यावे. दूध वितरकांना सकाळी ७ ते ९ आणि संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत दूध वितरणास परवानगी असेल. दूध वितरकांनी संबंधित तहसीलदार यांच्याकडून ओळखपत्र घेणे आवश्यक आहे.
वृत्तपत्र कार्यालये आणि वृत्तपत्र छपाई व वितरणास अनुमती असेल. किराणा आस्थापना सकाळी ६ ते ११ या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी राहील. पाचपेक्षा अधिक व्यक्ती दुकानात आढळल्यास दंडात्मक कारवाई करून दुकान सील केले जाईल. दुकानाच्या समोरील बाजूस ‘मास्क नाही तर प्रवेश नाही’ असा फलक लावावा व सोशल डिस्टन्सिंगचे पालन होण्यासाठी खुणा कराव्यात. सर्व प्रकारची मालवाहतूक व अत्यावश्यक सेवेसाठी गॅरेज सुरू ठेवण्यास परवानगी असेल.
गॅस वितरण पूर्णवेळ सुरू राहील. पेट्रोलपंप केवळ अत्यावश्यक सेवा व शासकीय वाहनांसाठी सुरू राहतील. यासाठी आवश्यक पुरावा संबंधिताने वितरकास दाखविणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग व मान्यताप्राप्त विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी संबंधित परीक्षा केंद्र, नियुक्त अधिकारी, कर्मचारी, यंत्रणा यांना परीक्षा कामकाजासाठी मुभा राहील. परीक्षार्थ्यांनादेखील मुभा राहील. तथापि, त्यांनी ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे.
अंत्यविधीसाठी २० पेक्षा अधिक व्यक्तींना अनुमती असणार नाही. सर्व शासकीय कार्यालये, बँका शासकीय वेळेत सुरू राहतील. पोलीस, होमगार्ड, जिल्हा सूचना केंद्र, महावितरण, सशस्त्र दले, अग्निशमन दल, शासकीय धान्य गोदाम, कारागृहे, म्युनिसिपल सेवा कोणत्याही बंधनाशिवाय सुरू राहील. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सोबत ओळखपत्र बाळगणे आवश्यक आहे. याशिवाय, शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश लागू राहतील.