कंपनीचे 44 हजार वीज ग्राहकांकडे थकले 22 कोटी रूपयांचे वीजबील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 12:12 IST2021-02-15T12:12:12+5:302021-02-15T12:12:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मार्च २०२० मध्ये घोषित केलेल्या लॉकडाऊन कालखंडात वीज ग्राहकांना अखंडित व नियमित वीजपुरवठा महावितरणने ...

कंपनीचे 44 हजार वीज ग्राहकांकडे थकले 22 कोटी रूपयांचे वीजबील
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मार्च २०२० मध्ये घोषित केलेल्या लॉकडाऊन कालखंडात वीज ग्राहकांना अखंडित व नियमित वीजपुरवठा महावितरणने केला होता. एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या दहा महिन्याच्या काळात थकीत वीजबिलापोटी कोणत्याही ग्राहकांचा वीजपुरवठा खंडितही केला नव्हता. यातून कंपनीच्या थकबाकीची रक्कम ही २२ कोटी रूपयांच्या घरात पोहोचली असून या बिलांच्या वसुलीची माेहिम सध्या जोरदारपणे सुरु आहे.
एकूण २२ कोटी रूपयांच्या थकबाकीत केवळ घरगुतीच नव्हे तर व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांच्या वीज बिलांच्या थकीत रकमेचा समावेश आहे. बिल थकीत असलेल्या ४४ हजार ग्राहकांपैकी १ हजार पेक्षा अधिक ग्राहकांची वीज बिलांची रक्कम ही लाख रूपयांच्या पुढे असल्याची माहिती समोर आली आहे. व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रासाठी हे वीज बिल वापरण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान कंपनीकडून बिलांच्या वसुलीची मोहिम अधिक गतीमान करण्यात आली असून मोठ्या रकमा असलेल्या ग्राहकांसोबत दरदिवशी संपर्क करुन वीज बिल भरण्यासंदर्भात माहिती घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरमहा वसुलीच्या सुमारे ८० ते ८५ टक्के रकमेतून वीजखरेदी केली जाते. वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा सुरु असल्याची माहिती कंपनीच्या अधिका-यांकडून देण्यात आली आहे. मात्र दर महिन्यात होणाऱ्या वीजबिल वसुलीचे प्रमाण कमी असल्याने वीजखरेदी, कंत्राटदारांची देणी, कर्जांचे हप्ते, आस्थापना खर्च, दैनंदिन देखभाल व दुरुस्ती खर्च भागवणे अशक्य होत असल्याने मोहिम तीव्र करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. ग्राहकांकडे शिल्लक असलेल्या थकबाकीमुळे वीज पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने कंपनीकडून वसुली केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान कंपनीकडून इन्स्टाॅलमेंट पद्धतीने वीज बिल भरण्याची मुभा देेण्यात आली असल्याने ग्राहकांना सोयीचे झाले असल्याचा दावा वीज वितरण कंपनीकडून करण्यात आला आहे.
कृषी क्षेत्रातील वीज बिलाचे व्याज केले माफ
नंदूरबार जिल्ह्यातील ५५ हजार ५०७ कृषिपंप ग्राहकांकडे सद्यस्थितीत ७४५ कोटी ३१ लाख रुपयांची एकूण थकबाकी आहे. यातील निर्लेखन, व्याज व विलंब आकाराचे एकूण २५८ कोटी ८० लाख रुपये महावितरणकडून माफ करण्यात आले आहेत. या कृषी ग्राहकांनी उरलेल्या ४८६ कोटी ५१ लाखांच्या मूळ थकबाकीपैकी ५० टक्के रकमेचा वर्षभरात भरणा केल्यास थकबाकीची उर्वरित ५० टक्के म्हणजे २४३ कोटी २५ लाखांची रक्कम माफ करण्यात येणार आहे. यामुळे शेतक-यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील ४४ हजार ३२३ ग्राहकांकडे २२ कोटी रूपयांची बिलांची रक्कम थकीत आहे. रकमेची वसुली करण्यासाठी मोहिम उघडण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत बिल न भरणा-या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्याचे धोरण स्विकारले गेले आहे. यातून काही ठिकाणी नाराजीही व्यक्त करण्यात आली आहे. औद्योगिक क्षेत्रातही याचप्रकारे कामकाज सुरु आहे.
वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांच्या सोयीसाठी कामकाज करण्यात येत आहे. घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक अशा तिन्ही ठिकाणच्या वीज बिलांचा भरणा ग्राहकांनी करावा यासाठी त्यांना वेळोवेळी सुचवले जात आहे. ग्राहकांचे वीज बिल अधिक असल्यास त्यांना टप्प्याटप्प्याने बील भरता यावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. सर्व प्रकारच्या बिलांची योग्य पद्धतीने वसुली करण्यात येईल. ग्राहकांनी सहकार्य केल्यास जिल्ह्यातील थकीत बिलांची वसुली लवकर होणार आहे. शेतक-यांसाठी वीज कंपनीने चांगली योजना आणली आहे.
-अनिल बोरसे,अधिक्षक अभियंता, नंदुरबार.