कोरोना विषाणू संक्रमणाला आळा घालण्यासाठी लसीकरण हा महत्त्वाचा घटक आहे, मात्र ग्रामीण भागातील आदिवासी नागरिकांमधे या लसीकरणाबाबत अनेक गैरसमज पसरले आहेत. आदिवासींमधील शिक्षणाचा अभाव व अंधश्रद्धा यांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी लसीकरण मोहिमेला अपेक्षित प्रतिसाद दिलेला नाही. आदिवासींमध्ये जनजागृती व्हावी, त्यांचे १०० टक्के लसीकरण व्हावे यासाठी आमदार राजेश पाडवी यांनी लसीकरण करणाऱ्या प्रत्येक आदिवासी नागरिकाला प्रत्येकी दोन किलो साखर व तांदूळ प्रोत्साहन म्हणून दिले जाईल, अशी घोषणा केली होती. मंगळवारी शहादा तालुक्यातील नांदे येथे व्यस्तीबाई गोरख ठाकरे (९५) या वयोवृद्ध आदिवासी महिलेचे लसीकरण करून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. नांदे येथे ६० व मालदा येथे ५० अशा एकूण ११० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
यावेळी आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले की, महाराष्ट्रात कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. कोरोनासारख्या भयंकर आजारावर मात करायची असेल तर प्रत्येकाने कोरोना प्रतिबंधक लस घेण्याची गरज आहे. आदिवासी समाजात कोरोना प्रतिबंधक लसीबद्दल गैरसमज पसरविण्यात आला आहे. त्यामुळे प्रोत्साहन म्हणून ४५ वर्षांवरील ग्रामीण भागातील कोरोना प्रतिबंधक लस घेणाऱ्या पुरुष व महिलांना दोन किलो तांदूळ व दोन किलो साखर देण्यात येत आहे. कारण लॉकडाऊनमुळे मजूर वर्गाला काम नाही म्हणून ही योजना राबविण्यात येत आहे. उद्दिष्ट एवढेच आहे की, १०० टक्के लसीकरण करून घेण्याचा आमचा मानस असल्याचे ते म्हणाले.
या वेळी गटविकास अधिकारी रघुवेंद्र घोरपडे, प्रभारी तालुका आरोग्याधिकारी डॉ. मणिलाल शेल्टे, तालुका शिक्षणाधिकारी उषा पेंढारकर, तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, दिनेश खंडेलवाल, नांदेचे सरपंच काशीराम मोरे, मालदाचे सरपंच गोपी पावरा, रामपूरचे सरपंच नर्मदा पावरा, कुसुमवाडाचे सरपंच दिलीप पवार, सरकारी स्वीय सहायक वीरसिंग पाडवी, अदिवासी मोर्चा जिल्हा सचिव नारायण ठाकरे, प्रविण वळवी, आदिवासी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दंगल सोनवणे, दीपक ठाकरे, दिनेश कोराणे, ग्रामपंचायत सदस्य काशीराम मोरे, मनोज बागुल, अविनाश सामुद्रे, ग्रामसेवक किशोर वळवी, सोनू वळवी, हेमराज पवार, विक्की ठाकरे व ग्रामस्थ उपस्थित होते.