रमजान ईद साधेपणाने साजरी करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:30 IST2021-05-13T04:30:54+5:302021-05-13T04:30:54+5:30
राज्य शासनाच्या १३ एप्रिल रोजीच्या आदेशातील तरतुदींच्या अधीन राहून विशेष खबरदारी घेत रमजान ईद साजरी करण्याबाबत सूचना देण्यात ...

रमजान ईद साधेपणाने साजरी करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन
राज्य शासनाच्या १३ एप्रिल रोजीच्या आदेशातील तरतुदींच्या अधीन राहून विशेष खबरदारी घेत रमजान ईद साजरी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने हे आवाहन करण्यात आले आहे. यावर्षी कोविड-१९ चा संसर्ग टाळण्यासाठी पवित्र रमजान ईद करिता मुस्लिम बांधवांनी नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी मशिदीमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी सर्व धार्मिक कार्यक्रम आपल्या घरातच साजरे करून ‘ब्रेक द चेन’ आदेशाचे पालन करणे उचित ठरेल. नमाज पठण करिता मशिदींमध्ये तसेच मोकळ्या जागेत एकत्र येऊ नये. रमजान ईद निमित्ताने स्थानिक प्रशासनाने सामान खरेदीसाठी वेळेचे बंधन घालून दिले असून त्याचे तंतोतंत पालन करण्यात यावे. त्या वेळे व्यतिरिक्त सामान खरेदीसाठी गर्दी करू नये किंवा एकत्र जमू नये.
कोविड-१९ विषाणूच्या वाढत्या संसर्गास प्रतिबंध करण्यासाठी राज्यात फौ.दं.प्र.सं.कलम १४४ लागू असल्याने व रात्रीची संचारबंदी असल्याने संचारबंदी कालावधीत रस्त्यावर स्टॉल लावू नये आणि नागरिकांनी रस्त्यावर विनाकारण फिरू नये. रमजान ईद निमित्ताने कोणत्याही प्रकारे मिरवणुका, धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये.
धार्मिक स्थळे बंद असल्याने मुस्लिम समाजातील धर्मगुरू, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि स्वयंसेवी संस्थांनी पवित्र रमजान ईद साधेपणाने साजरी करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करावी. रमजान ईदच्या दिवशी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्याबाबत काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
कोविड-१९ च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच प्रत्यक्ष उत्सव सुरू होण्याआधी व चालू असतानाच्या मधल्या कालावधीत काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.
कोणत्याही व्यक्ती, समूह अथवा संस्था, मंडळ, संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथ प्रतिबंधक कायदा, फौजदारी प्रक्रिया संहिता, भारतीय दंड संहितामधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.