आठवी ते १२ वीचे वर्ग १५ जुलैपासून सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:20 IST2021-07-09T04:20:18+5:302021-07-09T04:20:18+5:30

खांडबारा : राज्य शासनाने इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासंबंधीचे सोमवारी काढलेल्या शालेय विभागाच्या परिपत्रकात नव्याने सुधारणा करून ...

Classes 8th to 12th will start from 15th July | आठवी ते १२ वीचे वर्ग १५ जुलैपासून सुरू होणार

आठवी ते १२ वीचे वर्ग १५ जुलैपासून सुरू होणार

खांडबारा : राज्य शासनाने इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासंबंधीचे सोमवारी काढलेल्या शालेय विभागाच्या परिपत्रकात नव्याने सुधारणा करून १५ जुलैपासून राज्यात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे.

मात्र, वर्ग सुरू करण्यापूर्वी गावात एक महिना अगोदर तरी कोरोना रुग्ण आढळलेला नसावा, ग्रामपंचायत स्तरावर समिती गठित करावी, शिक्षकांची कोरोना टेस्ट करावी, शिक्षकांचे लसीकरण करावे, विद्यार्थ्यांनी शाळेत यावे यासाठी ‘चला मुलांनो, शाळेत चला’ ही मोहीम राबवण्याचे शालेय शिक्षण विभागाने कळविले आहे.

राज्यात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासंबंधीचे परिपत्रक सोमवारी शालेय शिक्षण विभागाने जाहीर केले होते; परंतु काही वेळातच ते मागे घेतले गेले. त्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, शालेय शिक्षण विभागाने आधीच या परिपत्रकात बदल करून नवीन परिपत्रक जाहीर केले व १५ जुलैपासून आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता दिली.

ग्रामपंचायत स्तरावर सरपंच यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांची समिती गठित करून चर्चा करावी. तसेच शाळा सुरू करण्यापूर्वी गावात किमान एक महिना अगोदर तरी कोरोना रुग्ण आढळलेला नसावा, शाळेतील सर्व शिक्षकांचे लसीकरणाचे नियोजन करावे, त्यासाठी शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करावा.

शाळेत कोरोनाबाधित विद्यार्थी आढळल्यास त्वरित शाळा बंद करून निर्जंतुकीकरण करावे, विद्यार्थ्यांना विलगीकरण कक्षात दाखल करावे, वैद्यकीय तपासणी करावी, शाळा तात्पुरती बंद करावी लागल्यास शिक्षण सुरू राहण्यासाठी काय उपाययोजना करावी, याचा कृती आराखडा तयार करण्यासंबंधी सूचना परिपत्रकात देण्यात आल्या आहेत.

शाळा सुरू करण्यापूर्वी ‘चला मुलांनो शाळेत चला’ ही मोहीम राबवावी. तसेच शिक्षक व कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करून त्यांचे रिपोर्ट व्यवस्थापनाने तपासावे व ते दप्तरी ठेवावे. सर्व कर्मचाऱ्यांचे आणि शिक्षकांचे लसीकरण करून घ्यावे. विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यासाठी पालकांचे संमतीपत्र घेण्यात यावे. शाळेत कोरोना संबंधीचे सर्व नियम काटेकोरपणे पाळावेत. सर्वांनी मास्क लावणे, सामाजिक अंतर पाळणे, सातत्याने साबणाने हात धुण्यासाठी शाळेत उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे शिक्षण विभागाच्या परिपत्रकात दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे. शाळा सुरू होणार असल्याने एकंदरीत विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.

Web Title: Classes 8th to 12th will start from 15th July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.