लोकशाही दिनाकडे नागरिकांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 21:21 IST2020-02-05T21:20:49+5:302020-02-05T21:21:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तक्रारी निकाली निघण्याचे प्रमाण आणि त्याची अंमलबजावणी याचे प्रमाण पहाता जिल्हास्तरीय लोकशाही दिनाकडे नागरिकांकडून ...

लोकशाही दिनाकडे नागरिकांची पाठ
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तक्रारी निकाली निघण्याचे प्रमाण आणि त्याची अंमलबजावणी याचे प्रमाण पहाता जिल्हास्तरीय लोकशाही दिनाकडे नागरिकांकडून पाठ फिरविली जात असल्याचे दिसून येत आहे. वर्षभरात ३३ तक्रारी दाखल करण्यात आल्या पैकी अवघ्या नऊ तक्रारी निकाली निघाल्या आहेत. दरम्यान, लोकसभा, विधानसभा आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे चार महिने लोकशाही दिनच झाला नाही.
सर्वसामान्य नागरिकांना जलद गतीने न्याय मिळावा व त्यांच्या तक्रारींचे निराकारण व्हावे यासाठी शासनाने लोकशाही दिनाचा उपक्रम सुरू केला आहे. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरावर हा दिन आयोजित केला जात असतो. सुरुवातीला या ठिकाणी येणाऱ्या तक्रारींचे प्रमाण चांगले होते. नंतर मात्र तक्रारींची संख्या एक आकडी संख्येवर येवून ठेपली आहे. याला कारण तक्रारी निकाली निघण्याचे कमी असलेले प्रमाण हे कारण कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे.
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या १२ महिन्यापैकी चार महिने लोकसभा, विधानसभा आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हा दिन आयोजितच केला गेला नसल्याची स्थिती आहे. आठ महिन्यात दाखल झालेल्या ३३ तक्रारींपैकी अवघ्या नऊ तक्रारी निकाली निघाल्या आहेत.
तक्रारी दाखल करतांना त्या शासनाच्या विविध विभागांसदर्भात असणे आवश्यक असते. परंतु अनेक नागरिक हे त्यांच्या वैयक्तिक स्वरूपाच्या तक्रारी दाखल करीत असतात. अशा तक्रारी स्थानिक पोलीस ठाणे किंवा संबधीत ठिकाणी निकाली निघू शकतात. परंतु लोकशाही दिनाचे अस्त्र वापरून अशा तक्रारी दाखल करण्याचे प्रमाण सुरुवातीला सर्वाधिक होते. नंतर ते प्रमाण कमी झाले आहे.
लोकशाही दिनाच्या तक्रारी ऐकण्यासाठी सर्व संबधित विभागांच्या प्रमुखांना उपस्थित राहणे आवश्यक असते. त्यात स्वत: जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, बांधकाम विभाग, परिवहन विभाग, सहकार विभाग, कृषी, पाणीपुरवठा, नगरपालिका मुख्याधिकारी यांच्यासह इतर सर्व प्रमुख विभागांचे अधिकारी यांची उपस्थित आवश्यक असते.
तक्रार दाखल केल्यानंतर त्याची पोचपावती मिळत असते. तक्रारीचा अर्ज संबधित विभागाकडे पाठविला जातो. प्रत्यक्ष लोकशाही दिनाच्या दिवशी त्यावर चर्चा होऊन संबधिताचे समाधान करण्याचा प्रयत्न असतो.
तक्रारदाराचे म्हणने ऐकुण घेत संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण द्यावे लागते. त्यानंतर जिल्हाधिकारी ती तक्रार निकाली काढत असतात.
ार्वाधिक तक्रारींचे प्रमाण हे वसाहतींमध्ये अतिक्रमण, घराजवळ अतिक्रमण, पोलीस ठाणे, वाहन, घर विक्री यासह इतर प्रकारच्या तक्रारींच्या लोकशाही दिनात समावेश होत आहे. महिला लोकशाही दिनात देखील अशाच प्रकारच्या तक्रारी येत असतात. तालुकास्तरावरील लोकशाही दिनाची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. अनेक वेळा तर तालुकास्तरीय लोकशाही दिनात एकही तक्रार दाखल राहत नाही.