ग्रामसेवकाच्या दांड्यामुळे नागरिक कंटाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:58 IST2021-02-06T04:58:23+5:302021-02-06T04:58:23+5:30
ब्राह्मणपुरी : शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांची माहिती नागरिकांना देणे आणि त्यांची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी वा पातळीवर ग्रामपंचायत कार्यरत आहे. तेथे ...

ग्रामसेवकाच्या दांड्यामुळे नागरिक कंटाळले
ब्राह्मणपुरी : शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांची माहिती नागरिकांना देणे आणि त्यांची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी वा पातळीवर ग्रामपंचायत कार्यरत आहे. तेथे शासन व ग्रामस्थांमधील दुवा म्हणून ग्रामसेवकाची नियुक्ती करण्यात येते. मात्र, धडगाव तालुक्यातील महाराष्ट्र राज्यातील क्रमांक दोनचे असलेल्या थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथे ग्रामसेवक ग्रामपंचायतमध्ये नियमित उपस्थित राहात नसल्याने ग्रामसेवकाच्या अनियमिततेमुळे गावाचा विकास खुंटला असून, महत्त्वाच्या दस्तावेजासाठी पाड्यावरून येणाऱ्या ग्रामस्थांना ग्रामपंचायतमध्ये चकरा माराव्या लागतात.
जिल्ह्याच्या धडगाव तालुक्यातील तोरणमाळ हे अतिदुर्गम भागात वसलेले आहे. तोरणमाळ ग्रुप ग्रामपंचायतीला एकूण १० गावे तसेच ६५ पाडे जोडली गेली आहेत. त्यात २२ हजारांहून अधिक लोकसंख्या असल्याने येथील ग्रामस्थांना महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी तोरणमाळ येथील ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या कार्यालयात यावे लागत असते. परंतु संबंधित ग्रामसेवक हे अनियमित येत असल्याने कागदपत्रांसाठी ग्रामस्थांना धडगाव किंवा शहादा येथे जावे लागत असल्याचे बोलले जात आहे. नियमानुसार, शासकीय कर्मचाऱ्याने आपल्या कामाच्या मुख्यालयी उपस्थित राहणे आवश्यक आहे. परंतु तोरणमाळ येथील ग्रामसेवक शासकीय बैठकीच्या नावावर दांडी मारत आहेत. ग्रामसेवक आठवड्यातून एक-दोन वेळा येतात. ते वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात असतात. त्यामुळे त्यांना बळ मिळू लागले आहे. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शासकीय कामकाजावर विपरित परिणाम होत आहे.
ग्रामस्थांना किंवा विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या दस्तावेजाची गरज पडली तर मोबाइलने त्यांना संपर्क करून पत्ता विचारावा लागतो. ग्रामसेवक आपले खरे लोकेशन सांगत नाहीत. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या मागे चकरा माराव्या लागतात. ते उपस्थित असलेल्या ठिकाणी मागणीनुसार दाखले उपलब्ध करतात. तसेच अनेकांच्या घरकुलांचे काम पूर्ण होऊनही देयक अदा केले जात नाही. ज्यांनी पैसे दिले, त्यांची देयक वेळेवर दिली जातात.
उंटावर बसून शेळ्या हाकण्याचा प्रकार बंद करावा
तोरणमाळ ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गाव पाड्यातील ग्रामस्थांना महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता भासत असल्याने येथील ग्रामपंचायत शिपायामार्फत ग्रामसेवक मुख्यालयीन राहता घरी बसून कागदपत्रे देत असल्याचेदेखील समोर आले आहे. जोपर्यंत सही शिक्का करून कागदपत्रे येत नाही तोपर्यंत ग्रामस्थांना प्रतीक्षा करावी लागत असते. यामुळे संबंधित ग्रामसेवकाने उंटावर बसून शेळ्या हाकण्याचा प्रकार बंद करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
संगणक धूळखात
डिजिटल कामकाजाचा ग्रामस्थांना लाभ होणार या अनुषंगाने सरकार डिजिटल ग्रामपंचायत करून कमी वेळेत सेवा मिळवून देण्यासाठी नियोजन करीत आहे. ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता यावी. ग्रामस्थ देशभरात कुठेही वास्तव्यास असले तरी ग्रामपंचायतीच्या ऑनलाइन सेवेचा लाभ त्यांना घेता यावा, कर आकारणी, नागरी सेवा, पंचायत नोंदणी पुस्तक, सभा व्यवस्थापन, स्थावर मालमत्ता माहिती, पंचायत लेखांकन, डेड स्टॉक रजिस्टर, संकलित अहवाल आदींच्या नोंदी यासाठी तोरणमाळ ग्रामपंचायतीत वाय-फाय सेवा बसविण्यात आली होती, परंतु संगणक हे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत पडल्याने संगणकीकृत कामच होत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वाय-फाय कनेक्शन शोभेची वस्तू बनून पडली आहे.
गावातील एलईडी बंद
तोरणमाळ ग्रुप ग्रामपंचायतने तोरणमाळ गावात काही ठिकाणी एलईडी विद्युत दिवे खरेदी केले आहेत. ते निकृष्ट आणि कमी प्रकाश देणारे आहेत. त्यामुळे ते अल्पावधीतच बंद पडले आहेत. त्याबाबत अनेकवेळा तोंडी तक्रारी देऊनही अधिकाऱ्यांनी लक्ष दिलेले नाही. यामुळे महाराष्ट्र राज्यात क्रमांक दोनचे असलेले थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ येथे पर्यटन स्थळी येणाऱ्या पर्यटकांना अंधाराचा सामना करावा लागत असतो. वारंवार नादुरुस्ती होणाऱ्या या एलईडी विद्युत दिवे खरेदीत मोठ्या प्रमाणात घोटाळा उघडकीस येऊ शकतो.