मुख्यमंत्र्यांच्या शाबासकीने परिचारिकांचा मान उंचावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:28 IST2021-03-20T04:28:57+5:302021-03-20T04:28:57+5:30
नंदुरबार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयात प्रवेश करताच परिचारिकांची विचारपूस करून त्यांनी कामाचे कौतुक करून शब्दरूपाने जी शाबासकी ...

मुख्यमंत्र्यांच्या शाबासकीने परिचारिकांचा मान उंचावला
नंदुरबार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयात प्रवेश करताच परिचारिकांची विचारपूस करून त्यांनी कामाचे कौतुक करून शब्दरूपाने जी शाबासकी दिली तो क्षण म्हणजे गेल्या २५ वर्षांच्या सेवेतील सर्वोच्च आनंदाचा क्षण होता. यामुळे संपूर्ण राज्यातील परिचारिकांच्या सेवेचा सन्मान झाला असल्याची प्रतिक्रिया धडगाव ग्रामीण रुग्णालयातील परिचारिका रचना परमार यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी धडगाव ग्रामीण रुग्णालयात प्रवेश करताच अधिकाऱ्यांनी दाखवलेला लसीकरण कक्षाचा मार्ग बदलून अचानक परिचारिकांच्या घोळक्यात येऊन उभे राहिले. तेथे त्यांनी थेट संवाद साधत परिचारिकांची विचारपूस केली. ‘तुमच्या काही अडचणी आहेत का? तुमच्यामुळेच आम्ही सुरक्षित आहोत, तुमच्या सेवेला सलाम... सर्व जण चांगले काम करत आहात, असेच काम सुरू ठेवा, त्याचीच गरज आहे...’ या शब्दात संवाद साधला. मुख्यमंत्र्यांच्या या संवादाने प्रोटोकॉलमुळे काहीशा भांबावलेल्या परिचारिकांनीही क्षणात मनातील भीती दूर करीत मुख्यमंत्र्यांशी वार्तालाप सुरू केला. त्यामुळे एक वेगळे भावनिक व आपुलकीचे वातावरण ग्रामीण रुग्णालयात पहायला मिळाले. एवढेच नव्हे तर सर्व परिचारिकांसोबत मुख्यमंत्र्यांनी स्वत:हून फोटोही काढून घेतल्याने परिचारिकांमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर रुग्णालयातील परिचारिकांनी सेवेतील सर्वोच्च आनंदाचा क्षण असल्याचे सांगितले. आजवर रुग्णांच्या सेवेसाठी आम्ही जीवाची पर्वा न करता काम केले. त्यासंदर्भात काहीवेळा शाबासकी व काहीवेळा बोलणेही ऐकावे लागले. समाजाकडूनही संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या शब्दात कामाचे कौतुक केले ते सर्व परिचारिकांचा सन्मान वाढविणारे असल्याची प्रतिक्रिया मीनल वळवी व इतर परिचारिकांनी व्यक्त केली.
दरम्यान, रुग्णालयातील पाहणी व रोपवाटिकेच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांना जेव्हा पत्रकारांनी घेरले तेव्हा त्यांनी आपण पत्रकार परिषद घेणार नसल्याचे सांगितले. मात्र धडगाव, मोलगीच्या दौऱ्यातील अनुभवाबाबत विचारले असता त्यांनी कोरोना संदर्भातील जनजागृती व लसीकरणाची माहिती दिली. पण शरद पवार गृहमंत्र्यांना भेटल्याचा प्रश्न काढताच मुख्यमंत्र्यांनी वार्तालाप थांबवला.