रुग्णवाहिकेसाठी सभापती थांबले ताटकळत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 12:23 IST2020-02-12T12:22:50+5:302020-02-12T12:23:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : रुग्णांना तातडीची सेवा मिळावी, यासाठी आरोग्य विमागामार्फत १०८ रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या. परंतु तळोद्याचे ...

रुग्णवाहिकेसाठी सभापती थांबले ताटकळत
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : रुग्णांना तातडीची सेवा मिळावी, यासाठी आरोग्य विमागामार्फत १०८ रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या. परंतु तळोद्याचे पंचायत समिती सभापती यशवंत ठाकरे यांनी आणलेल्या रुग्णालाच तळोदा उपजिल्हा रुग्णालयात चार तासाची प्रतिक्षा करुनही रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. त्यामुळे आरोग्य सेवेबाबत शोकांतिका व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील गंभीर रुग्णांना अपेक्षेनुसार व वेळेवर उपचार मिळावा यासाठी आरोग्य विभागामार्फत स्वतंत्र वैद्यकीय पथकांसह १०८ रुग्णवाहिकांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पुणे येथील खाजगी संस्थेमार्फत साधारण सात रुग्णवाहिका कार्यान्वित करण्यात आल्या आहे. त्यामुळे अवघ्या जिल्ह्यातील रुणांना वेळेवर उपचार मिळण्याची जनतेला अपेक्षा आहे. परंतु प्रत्यक्षात उलटे होत असल्याने जनतेत या सेवेबाबत नाराजी शिवाय तक्रारीही वाढल्या आहे. गंभीर स्थितीतील रुग्णांसाठी असली तरी ही सेवा रुग्णांना वेळेवर मिळत नसल्याचा आरोप रुग्णांच्या पालकांकडून करण्यात येत आहे. बऱ्याचवेळा रुग्णवाहिकेवर हजर चालक नसतो तर कुठे वैद्यकीय अधिकारी नसल्याचा अनुभव जिल्ह्यातील रुग्णांना नेहमीच येत आहे.
अशा या भोंगळ कारभाराचा अनुभव तळोद्याचे पंचायत समिती सभापती यशवंत ठाकरे यांनाच आला. रापापूर ता.तळोदा येथील देविसिंग नारायण ठाकरे या व्यक्तीने आजाराला कंटाळून विष प्राशन केले. त्यात त्याची प्रकृती खालावली होती, त्यामुळे त्याच्यावर तातडीने उपचार होणे नितांत गरज होती. त्याला तळोदा उपजिल्हा रुग्णाललयात आणत त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्याला नंदुरबार यथील जिल्हा सामान्य रुग्णालयात न्यावे लागत होते. त्यानुसार त्या रुग्णाला १०८ रुग्णवाहिका उपलब्ध होणे आवश्यक होते. परंतु वैद्यकीय अधिकारीच नसल्याचे आढळून आले.
रुग्ण वाहिकेवर पूर्ण सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी सभापती ठाकरे यांनीच संपर्क केला. मात्र वैद्यकीय अधिकारी दोन तासांनी उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले. परंतु मात्र चार तास उलटूनही वैद्यकीय अधिकारी आले नाही. तातडीच्या उपचाराची गरज असल्यामुळे अखेर प्रतापपूर येथील रुग्णवाहिका पाचारण करावी लागली. त्याद्वारे रुग्णाला नंदुरबारकडे हलविता आले.
वास्तविक या रुग्णवाहिकांसाठी प्रशासनाकडून दरमहा तीन लाखांचा खर्च केला जातो. असे असतांनाही रुग्णांना वेळेवर व अपेक्षेनुसार सेवा मिळत नाही, ही या जिल्ह्यासाठी मोठी शोकांतिका असून याबाबत कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त कहोत आहे.
रुग्णवाहिका उपलब्ध झाली नसल्यामुळे चार महिन्यांपूर्वी एका रुग्णाला जीव गमवावा लागतो. मागील नोव्हेंबर महिन्या कोठार येथील गंभरी प्रकृतीच्या रुग्णाला जिल्हा रुग्णालयात हलविणे आवश्यक होते. त्यानुसार परंतु तळोदा रुगणालयामार्फत वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. अखेर त्याला खाजगी वाहनाने न्यावे लागले. परंतु वेळेअभावी त्या रुग्णाचा देखील मृत्यू झाला. त्यामुळे या सेवेबाबत शोकांतिका व्यक्त करण्यात येत आहे.