सावधान ११० गावांमध्ये पिण्याचे पाणीच ठरू शकते आजाराचे कारण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:35 IST2021-07-14T04:35:44+5:302021-07-14T04:35:44+5:30
नंदुरबार : जिल्ह्यातील विविध पाणी योजना आणि जलस्त्रोतांच्या जलनमुन्यांची तपासणी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत करण्यात येते. गेल्या वर्षातील संकलित करण्यात ...

सावधान ११० गावांमध्ये पिण्याचे पाणीच ठरू शकते आजाराचे कारण !
नंदुरबार : जिल्ह्यातील विविध पाणी योजना आणि जलस्त्रोतांच्या जलनमुन्यांची तपासणी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत करण्यात येते. गेल्या वर्षातील संकलित करण्यात आलेल्या सुमारे आठ हजार नमुन्यांपैकी ६०० नमुने हे दूषित असून हे नमुने ११० गावांमधून संकलित केले गेले आहेत.
दूषित असलेल्या पाणी नमुन्यांची तपासणी करण्याची जबाबदारी आरोग्य विभागाकडे देण्यात आली आहे. आरोग्य विभागाने गावोगावी नियुक्त केलेले मल्टीपल हेल्थ वर्कर अर्थात एमपीडब्ल्यू या पाणी नमुन्यांचे संकलन करत आहेत. त्यांच्याकडून हातपंप, पाणी योजना, विहिरी, सार्वजनिक नळ या ठिकाणांहून हे नमुने संकलित करून ते जिल्हा प्रयोगशाळेत आणले जातात. याठिकाणी त्याची तपासणी करून ते पिण्यायोग्य किंवा अयोग्य याचा अहवाल देत, ग्रामपंचायतींना सूचित केले जात आहे. यातून त्या-त्या गावांमध्ये उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्ह्यात क्षारयुक्त, फ्लोराईडयुक्त तसेच इतर द्रव असलेले पाणी अजिबात नसल्याचा दावा केला जातो. परंतु, जलजन्य आजार पसरवणारे दूषित नमुने मात्र आढळून येत असल्याने त्याठिकाणी उपाय केले जात असल्याचे सांगितले गेले आहे. हे नमुने शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागात गोळा केले जात आहेत. जिल्ह्यातून यंदा सर्वाधिक दीड हजार पाणी नमुने हे नवापूर तालुक्यातून गोळा करून त्यांची तपासणी करण्यात आली होती. यातील १० टक्के नमुने हे दूषित आहेत.
सर्वच ग्रामपंचायतींमधून नमुन्यांचे संकलन
एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या काळात जिल्ह्यातून हे पाणी नमुने संकलित करण्यात आले आहेत. नमुन्यांमध्ये दूषितपणा हा १०० टक्के किंवा त्यापेक्षा कमी असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यात बहुतांश सर्वच गावांचे पाणी नमुने तपासणी करण्यात आल्याचा दावा आरोग्य विभागाचा आहे. तालुक्यात यंदा जलजन्य आजाराची एकही घटना नसल्याचा दावाही आरोग्य विभागाचा आहे.
जिल्ह्यात पाणी योजनांचे पाईप हे वर्षानुवर्ष जुनाट आहेत. यामुळे काही गावांच्या पिण्याच्या पाण्याची योजनाच निकामी असल्याची माहिती समोर आली आहे.
जिल्ह्यात दरवर्षी सरासरी १० ते १५ हजारपेक्षा अधिक पाणी नमुने तपासणी करून त्याचा अहवाल दिला जातो. परंतु गेल्या वर्षापासून आलेला कोरोना या कामांना ब्रेक लावत आहे.गेल्या वर्षातील मार्च ते मे या तीन महिन्यांच्या काळात केवळ हजार नमुने संकलित करून तपासणी केली होती. सर्व सहा तालुक्यांतून प्रत्येक महिन्याला हजारापेक्षा कमीच नमुने संकलित करण्यात आल्याची माहिती आहे.
पावसाळ्यात जिल्ह्यात दूषित पाण्यामुळे अतिसार, जुलाब, डायरिया तसेच पोटाचे विकार होण्याची सर्वाधिक शक्यता असते. यामुळे पावसाळ्यापूर्वी नमुने तपासून त्याचा अहवाल देण्यावर भर दिला जातो. यातून पुढील उपाययोजनांसाठी आरोग्य विभाग लेखी आदेश काढत आहे.
जिल्ह्यात ५८६ ग्रामपंचायती, चार नगरपालिका व एक नगरपंचायत हद्दीतील विविध जलस्त्रोतांची माहिती संकलित केली गेली आहे. ज्या ठिकाणचे नमुने दूषित आहेत त्याठिकाणी आरोग्य विभागाचे पथक भेट देत उपाययोजनांना गती देत असल्याची माहिती देण्यात आली.
आजारी पडायचे नसले तर पाणी उकळून प्या
n दरम्यान, आरोग्य विभागाकडून जलजन्य आजारांपासून नागरिकांना स्वत:चा बचाव करता यावा यासाठी मार्गदर्शन केले जाते.
n यात प्रामुख्याने पाणी उकळून पिणे हा सल्ला असतो.
n तसेच पिण्याच्या पाण्यात जंतुनाशकाचा नियमित वापर करणे, पिण्याचा पाण्याचा माठ किंवा इतर तत्सम साहित्य स्वच्छ जागी ठेवावे, पाणी घेण्यासाठी स्वच्छ भांड्यांचा वापर करावा.