सीएए व एनआरसीच्या विरोधात निघाले मूकमोर्चे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 12:12 IST2019-12-21T12:11:49+5:302019-12-21T12:12:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध दर्शवत नंदुरबार आणि शहादा येथे विविध मुस्लिम संघटना व एमआयएमतर्फे ...

सीएए व एनआरसीच्या विरोधात निघाले मूकमोर्चे
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध दर्शवत नंदुरबार आणि शहादा येथे विविध मुस्लिम संघटना व एमआयएमतर्फे मूकमोर्चा व आंदोलन करण्यात आले़ आंदोलनात शेकडोंच्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते़ आंदोलकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व शहादा येथे तहसीलदार यांना निवेदन देत कायदा रद्द करण्याची मागणी केली़
नंदुरबार
शहरातील इलाही चौकातून दुपारी अडीच वाजता एमआयएमतर्फे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते़ सीएए आणि प्रस्तावित एनआरसी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी काढलेल्या मोर्चात युवकांसह आबालवृद्धांचा मोठा सहभाग होता़ मूूकमोर्चा असल्याने फलकांद्वारे मोर्चाचा उद्देश स्पष्ट करण्यात येत होता़ मच्छीबाजार चौक, साक्री नाका, नवापुर चौफुली या मार्गाने हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आला़ याठिकाणी एमआयएमचे पदाधिकारी व नेत्यांनी मार्गदर्शन केले़ यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले़ मोर्चासाठी शहरातील जळका बाजार, साक्री नाका, नवापुर चौफुली आणि जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनात पोलीस बंदोबस्त तैनात होता़ मोर्चासाठी नवापुर चौफुली तसेच साक्री नाका परिसरातून होणारी वाहतूक वळवण्यात आली होती़
शहादा
शहरातील खेतिया रोड परिसरात मोर्चाला सुरुवात होऊन चार रस्ता, गांधी पुतळामार्गे जुन्या तहसील कार्यालयात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, संसदने नुकतेच नागरिकत्व दुरुस्ती विधेयक पारीत केले आहे. हे विधेयक भारतीय मुस्लीम समाजासाठी अहितकारक व त्रासदायक असून भारतीय घटनेच्या सर्वधर्म समभाव या मूळ संकल्पेनेच्या विरुद्ध असल्याने सदरचा कायदा त्वरित रद्द करावा. सर्वधर्मियांना घटनेने धर्माचे आचरण करुन एकमेकांचा आदर करुन गुण्यागोविंदाने राहण्याचा अधिकार दिला आहे. हा कायदा म्हणजे धार्मिक असमानता व दोन समाजात तेढ निर्माण करुन लोकशाही व राज्यघटनेच्या विरुद्ध आहे. नागरिकांचे हित जोपासण्यासाठी सदर कायदा त्वरीत रद्द करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी पुंडलिक सपकाळे, पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़