भावांची चुकामूक झाली आणि अपहरणाची चर्चा रंगली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 12:38 IST2019-12-29T12:37:52+5:302019-12-29T12:38:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : चिखली आश्रमशाळेच्या विद्यार्थ्याच्या अपहरणाच्या नाट्यावर अखेर त्याच्याच भावाच्या खुलाशानंतर पडदा पडला. यामुळे मात्र, अपहरणाच्या ...

भावांची चुकामूक झाली आणि अपहरणाची चर्चा रंगली!
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : चिखली आश्रमशाळेच्या विद्यार्थ्याच्या अपहरणाच्या नाट्यावर अखेर त्याच्याच भावाच्या खुलाशानंतर पडदा पडला. यामुळे मात्र, अपहरणाच्या संशयावरून एकच खळबळ उडाली होती. याबाबत म्हसावद पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
मुळचा नंदलवड, ता.धडगाव येथील रहिवासी व चिखली आश्रमशाळेत शिकणारा गणेश हुरता वळवी (१३) या विद्यार्थ्याचे चिखली फाट्यावरून दोन दिवसांपूर्वी रिक्षा चालकाने अपहरण केल्याची माहिती त्याचा भाऊ फिनीश हुरता वळवी (१२) याने दिली होती. यामुळे आश्रम शाळा प्रशासन आणि मुलाच्या नातेवाईकांमध्ये खळबळ उडाली होती. गणेश वळवी याचा ठिकठिकाणी शोध घेण्यात येत होता. पोलिसातही नोंद झाली. परंतु मुलाचे वडिल हुरता जत्र्या वळवी यांनी फिनीश यास विश्वासात घेवून त्याच्याकडून माहिती घेतली. त्यानंतर या सर्व घटनेचा उलगडा झाला. फिनिश याच्या माहितीनुसार, गावाहून परत आल्यावर चिखली फाट्यावर उतरलो, परंतु कुठल्याही रिक्षात बसलो नाही. बुडीगव्हाण गावात एका घराच्या बांधकामाच्या ठिकाणी रात्रभर मुक्काम केला. त्यानंतर जंगलात थांबलो. तेथे आमची चुकामूक झाली. २७ रोजी चिखली फाट्याजवळ उभा असतांना आश्रमशाळा शिक्षक जाधव यांना तो दिसला. त्यावेळी गणेश याने अपहरणाचा बनाव रचल्याचे त्याने स्पष्ट केले. भाऊ व आपली चुकामूक झाल्याने शेतात थांबलो होतो असेही त्याने सांगितले. त्यानंतर फिनिश देखील गवसला. ही बाब पोलिसांसमोर कथन झाल्याने या वादावर अखेर पडदा पडला.
दरम्यान, याबाबत हुरता जत्र्या वळवी यांनी म्हसावद पोलिसात फिर्याद दिली होती. सहायक निरिक्षक किरण पवार यांनी लागलीच तपासाची चक्रे फिरविण्यास सुरुवात केली. त्यावरून विद्यार्थ्याच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या उलगड्यानंतर पोलिसांना आणि आश्रमशाळा व्यवस्थापनालाही हायसे वाटले. मुलाचे वडिल हुरता वळवी यांनीही गैरसमजुतीतून फिर्याद दिल्याचे पोलिसात लिहून दिले.
असे झाले बनावट अपहरण... चिखली आश्रम शाळेत जाण्यासाठी एका रिक्षात बसलो, आश्रमशाळाकडे न जाता रिक्षा चालकाने डिझेल भरावयाचे असल्याचे सांगून रिक्षा बुडीगव्हाण गावाकडे वळविली. आपण घाबरून चालत्या रिक्षातून उडी मारली. त्यामुळे आपण बचावलो. गणेश याचे काय झाले माहिती नाही, रिक्षा चालक कुठे घेवून गेला माहिती नसल्याचे फिनिश याने सांगितले होते.