पथकाने धाड टाकताच वऱ्हाडींची झाली पळापळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:49 IST2021-05-05T04:49:23+5:302021-05-05T04:49:23+5:30

नंदूरबार : २५ पेक्षा अधिक जणांच्या उपस्थितीत शुभमंगल सावधान करताच पथकाने निंबेल (ता. नंदुरबार) व नंदूरबारातील गवळीवाडा परिसरात ...

The brides fled as soon as the squad raided | पथकाने धाड टाकताच वऱ्हाडींची झाली पळापळ

पथकाने धाड टाकताच वऱ्हाडींची झाली पळापळ

नंदूरबार : २५ पेक्षा अधिक जणांच्या उपस्थितीत शुभमंगल सावधान करताच पथकाने निंबेल (ता. नंदुरबार) व नंदूरबारातील गवळीवाडा परिसरात धाड टाकून वऱ्हाडींना ताब्यात घेतले. आयोजकांसह बँडवाल्यांवरही तालुका व शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. २ मे रोजी दुपारी ही कारवाई करण्यात आली.

निंबेल (ता. नंदूरबार) येथे आयोजित विवाह सोहळ्यात २५ पेक्षा अधिक लोकांची गर्दी असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत नियुक्त पथकाला मिळाली. पथकाचे अधिकारी तथा महसूल मंडळ अधिकारी प्रशांत नीळकंठ देवरे यांनी पथकासह लग्नमंडपात धाव घेतली. त्याठिकाणी शासकीय वाहन पाहताच वऱ्हाडी मंडळींमध्ये धावपळ उडाली. काहींनी शेजारच्या घरांमध्ये धाव घेतली तर काहींनी तेथून काढता पाय घेतला तरीही पथकाच्या निदर्शनास तेथे ६० ते ६५ जण आढळले. त्यातील काहींच्या तोंडावर मास्कदेखील नव्हता.

याबाबत प्रशांत देवरे यांनी फिर्याद दिल्याने अशोक बारकू पाटील, अमृत अशोक पाटील, योगीताबाई अमृत पाटील, गोविंदा साहेबराव पाटील, संगीताबाई गोविंदा पाटील (सर्व रा. निंबेल), बोधीसत्त्व खंडू पिंपळे (बँड मालक रा. वैंदाणे) यांच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार कमलाकर चौधरी करत आहेत.

दुसरी घटना नंदूरबारातील गवळीवाडा भागात घडली. याभागात देखील २५ पेक्षा अधिक व्यक्तींच्या उपस्थितीत विवाह सोहळा सुरू असल्याची माहिती पथकाचे प्रमुख तथा निवासी नायब तहसीलदार भीमराव बोरसे यांना मिळाली. त्यांनी पथकासह विवाहस्थळी धाव घेत तपासणी केली असता तेथे ५० ते ६० जणांची उपस्थिती दिसून आली. त्यांच्यापैकी अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हता, सोशल डिस्टन्सिंगचे पालन नव्हते. त्यामुळे भीमराव बोरसे यांनी कारवाई करत फिर्याद दाखल केली.

त्यावरून विशाल सुधाकर गवळी, लक्ष्मी गिरजाप्पा गवळी, गिरजाप्पा चिमाजी गवळी, रत्नाबाई गिरजाप्पा गवळी (सर्व रा. गवळीवाडा, नंदूरबार), अरुण आबाजी गवळी, संगीता अरुण गवळी, ज्ञानेश्वर अरुण गवळी (सर्व रा. न्यायडोंगरी, ता. नांदगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक विजय चौधरी करत आहेत.

Web Title: The brides fled as soon as the squad raided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.