प्रकाशा येथे दोन्ही भावांचे आठ दिवसाच्या अंतराने निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:29 IST2021-04-06T04:29:23+5:302021-04-06T04:29:23+5:30
सविस्तर वृत्त असे की, ‘सख्खा भाऊ पक्का वैरी’ या म्हणीला खोटं ठरवणारी घटना प्रकाशा येथे घडली. प्रकाशा ...

प्रकाशा येथे दोन्ही भावांचे आठ दिवसाच्या अंतराने निधन
सविस्तर वृत्त असे की, ‘सख्खा भाऊ पक्का वैरी’ या म्हणीला खोटं ठरवणारी घटना प्रकाशा येथे घडली. प्रकाशा येथील विजय मदन चौधरी (वय ५८) व लक्ष्मण मदन चौधरी (६२) हे दोघे भाऊ गावाच्या नागबरडा येथे राहत होते. त्यांचा मुख्य व्यवसाय शेती होता. त्यामुळे गावात हे दोघे भाऊ एकाच मोटारसायकल फिरत शेतीची कामे करत असत. एवढेच नव्हे, तर गावात किराणा, भाजीपाला घेण्यासह परिवारातील सुख-दु:ख, लग्नसमारंभ, पूजापाठ सर्व कार्यक्रमांना सोबतच फिरायचे. त्यामुळे दोन्ही भावांची जोडी प्रसिद्ध होती. ‘शोले’मधील जय आणि वीरूसारखी या भावांची पक्की मैत्री होती. बालपणापासून तर वयाच्या ५५-६० वर्षांपर्यंत एकमेकांची सावली बनून राहिले. दोघांचा स्वभाव शांत, मनमिळाऊ, होता. त्यामुळे गावात कोणाजवळ भांडण नव्हतेच. एक महिन्यापूर्वी लक्ष्मण चौधरी यांच्या मुलीची मुलगी म्हणजे नातीचा विवाह सारंखेडा येथे झाला. या सुखदप्रसंगी दोघा भावांच्या परिवाराने या विवाहाला उपस्थित राहून वधूवरांना आशीर्वाद दिले होते. या सुखदप्रसंगी कोणालाही जाणवले नाही की, त्यांच्या घरी एक महिन्याभरानंतर एवढा दुःखद प्रसंग येणार आहे. विजय चौधरी यांचा दुर्धर आजारावर औषधोपचार सुरू असताना २७ मार्च रोजी निधन झाले. या घटनेला आठ दिवस होत नाही तोच ३ एप्रिल रोजी म्हणजे त्यांचे मोठे बंधू लक्ष्मण मदन चौधरी यांचेही अचानक निधन झाले. दोन्ही भावांच्या निधनाच्या घटनेने कुटुंब सुन्न झाले आहे. दोन्ही भावांनी बालपण, शिक्षण, शेती व्यवसाय, संसार सर्व सोबतच केला आणि जगाचा निरोप घेतानाही सोबतच गेले.