आरती पूजन सोहळ्यासाठी भाविकांची मांदियाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 13:14 IST2019-07-16T13:14:06+5:302019-07-16T13:14:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील मोरवड येथे शांतीदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी संत रामदास महाराज यांच्या प्रतिमेची संपूर्ण ...

आरती पूजन सोहळ्यासाठी भाविकांची मांदियाळी
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : तालुक्यातील मोरवड येथे शांतीदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी संत रामदास महाराज यांच्या प्रतिमेची संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली होती. जिल्ह्याबरोबरच मध्यप्रदेश-गुजरात राज्यातील त्यांच्या हजारो अनुयायांनी आरती पूजन सोहळ्यास हजेरी लावल्याने संपूर्ण परिसर धार्मिक वातावरणाने ढवळून निघाला होता.
मोरवड येथील आदिवासी संत रामदास महाराज यांनी समाजामध्ये व्यसनाबाबत जनजागृती करून समाजातील व्यसनाधिनता दूर केली होती. ते 1960 साली स्वर्गवासी झाले. तेव्हापासून दरवर्षी त्यांच्या शिष्याकडून ‘शांती दिन’ साजरा करण्यात येत असतो. यंदाही हा दिवस व आरती पूजन सोहळा करण्यात आला. तत्पूर्वी संत गुलाम महाराज यांच्या मठास्थळी भजन, रामधून, प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी सात वाजेपासून रामदास महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक मठापासून काढण्यात आली. संपूर्ण गावातून वाजत-गाजत मिरवणू काढण्यात आली होती. प्रत्येक महिला अनुयायांच्या हातातील आरतीमुळे संपूर्ण परिसर प्रकाशाने उजळून निघाला होता.
रात्री 12 वाजेला महाराजांच्या समाधी स्थळी मिरवणुकीचे विसजर्न करण्यात आले. तेथे आरती पूजन करण्यात आले. या वेळी लक्ष्मण महाराज यांनी शिष्यांसमोर महाराजांचा संदेश वाचून दाखविला. यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला.
कार्यक्रमासाठी विधान परिषदेच्या आमदार स्मिता वाघ, माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ, अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष पाटील, माजी मंत्री अॅड.पद्माकर वळवी, माजी जिल्हा परिषद सभापती नरहर ठाकरे, आदिवासी महासंघाचे जिल्हाध्यक्ष हिरामण पाडवी, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश ठाकरे, तळवेचे सरपंच कृष्णा पाडवी, माळद्याचे सरपंच गोपी पावरा, किसन वळवी आदींसह हजारो भाविकांनी हजेरी लावली होती.
दरम्यान मठपती चंद्रसेन महाराज, जितेंद्र महाराज यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमास विविध सव्यावसायिकांनी हजेरी लावली होती. संत गुलाम महाराजाप्रमाणेच रामदास महाराजांनीही आदिवासी समाजामध्ये व्यसनमुक्तीचे कार्य करून समाजाला योग्य दिशा दाखविली होती. त्यामुळेच शांतीदिन आजतागायत साजरा केला जात आहे.