जामियातील बिहारी विद्यार्थी रेल्वेने रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 12:15 IST2020-05-06T12:15:00+5:302020-05-06T12:15:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या २०१४ बिहारी नागरिकांना दोन विशेष रेल्वेने बिहारला रवाना करण्यात आले़ यात ...

Bihari students from Jamia leave by train | जामियातील बिहारी विद्यार्थी रेल्वेने रवाना

जामियातील बिहारी विद्यार्थी रेल्वेने रवाना

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या २०१४ बिहारी नागरिकांना दोन विशेष रेल्वेने बिहारला रवाना करण्यात आले़ यात १ हजार ८०० विद्यार्थ्यांचा समावेश आहे़ हे विद्यार्थी अक्कलकुवा येथील जामिया शिक्षण संस्थेतील विद्यार्थी आहेत़ दरभंगा येथील ९९२ तर सहरसा राज्यातील १ हजार २२ जणांचा यात समावेश आहे़
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा अ‍ॅड़ सीमा वळवी, खासदार डॉ.हिना गावीत, आमदार डॉ. विजयकुमार गावीत, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, मंडळ रेल्वे प्रबंधक जीव्हीएल सत्यकुमार, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविशांत पांडा, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, जामिया संकुलाचे मौलवी हुजैफा, मौलवी, ओवैस वस्तानवी, मुख्याध्यापक रफिक जहागिरदार, मौलाना जावेद पटेल, अखलाख शेख, पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर, स्टेशन प्रबंधक वसंत मंडल, वाणिज्य निरीक्षक राजकुमार कुरील, स्टेशन अधिक्षक प्रमोद ठाकूर आदी उपस्थित होते़ रेल्वे स्टेशन परिसरात परिसरात चोख बंदोबस्त होता. सर्वांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन रेल्वेत बसवण्यात आले़ रेल्वेकडून गाड्या सॅनेटाईझ करुन फवारणीची व्यवस्था केली होती़ विद्यार्थी व नागरिकांना मास्क वाटप करण्यात आले़ गावी जायला मिळत असल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद होता़
अक्कलकुवा येथील जामिया संकुलात शिक्षण घेणारे बिहार राज्यातील पूर्णिया येथील १ हजार २४५ तर अरेरिया येथील १ हजार २१३ विद्यार्थ्यांसाठी बुधवारीही विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली आहे़ संकुलातून १ हजार ८२१ विद्यार्थी ५९ वाहनांद्वारे येथे दाखल झाले होते़ दुपारी दोन वाजता रेल्वेस्थानकावर नायब तहसीलदार आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपाययोजनांची माहिती दिली होती़ सायंकाळी साडेतीन व चार वाजता या रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या़

लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर बिहार राज्यातील काही मजूर आणि अक्कलकुवा येथील जामीया संकुलात सुमारे ४ हजार २४ विद्यार्थी जिल्ह्यात अडकले होते. यातील १ हजार ८२१ विद्यार्थी हे बिहार राज्यातील होते़ लॉकडाऊन कालावधी वाढल्याने विद्यार्थ्यांसह नागरिक घरी जावू देण्याची मागणी करत होते़ त्यांच्या मागणीनुसार पालकमंत्री अ‍ॅड़ के.सी.पाडवी व जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी बिहार राज्यशासनासोबत संपर्क पाठपुरावा करुन नागरिकांना स्विकारण्याची विनंती केली होती़ या पाठपुराव्याला यश येऊन बिहार प्रशासनाने विनंती मान्य केली होती़ यानुसार विद्यार्थी आणि मजूर यांचे बिहार येथे जाण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्र तयार करण्यात आले. श्रमीक एक्स्प्रेसने सर्वांना पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला़

लॉकडाऊन वाढल्यामुळे गावाकडे जाण्याचा नागरिकांचा आग्रह होता़ बिहार प्रशासनाने सहकार्य केले़ रेल्वेने देखील तातडीने सहकार्य केल्यामुळे नागरिकांना त्यांच्या गावी पाठविणे शक्य झाले आहे. आपत्ती व्यवस्थापन कार्यात असे काही माणूसकीचे क्षण कायम स्मरणात राहतात.
-डॉ़ राजेंद्र भारुड,
जिल्हाधिकारी, नंदुरबाऱ

Web Title: Bihari students from Jamia leave by train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.